( संगमेश्वर / मकरंद सुर्वे )
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील बाजारपेठ मुसळधार पावसामुळे अक्षरशः जलमय झाली. रात्रौ दोनच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे, राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या अपूर्ण भिंती आणि गटार नसल्याने पावसाचे सगळे पाणी थेट बाजारपेठेत शिरले. परिणामी, उमेश लोध, आंब्रे यांच्यासह अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात आणि घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले. चिखलाचे लोंढे रस्त्यावर साचल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. चिखलातून वाट काढत मार्केटमध्ये जावे लागत असून संपूर्ण भागात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
मे महिन्यापासून दुर्लक्ष; उपाययोजना शून्य
मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसातही बाजारपेठेत अशाच प्रकारे चिखल झाला होता. व्यापाऱ्यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केली होती. मात्र, ठेकेदार जे. एम. म्हात्रे यांनी अद्याप कोणतीही पावले उचललेली नाहीत. दोन दिवसांपूर्वीच मुख्य अभियंता शेलार यांनी स्थळदौरा केला, तरीही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. अधिकारी सूचना देतात, पण ठेकेदार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. हे सरकारी यंत्रणेच्या अपयशाचे ठळक उदाहरण ठरत आहे.
“ठेकेदार कोणाच्या छत्रछायेखाली?” – स्थानिकांची तीव्र प्रतिक्रिया
जर ठेकेदार प्रशासनाच्या आदेशालाही जुमानत नसेल, तर तो कोणाच्या वरवंट्याखाली काम करत आहे, असा सवाल नागरिक करत आहेत. नागरिकांच्या वारंवार निवेदने, तक्रारी, आणि जनतेच्या दरबारातील चर्चांनंतरही रस्त्यांचे काम, संरक्षण भिंतीचे बांधकाम, आणि गटारांची व्यवस्था अद्याप प्रलंबित आहे.
बायपास रस्त्याचे काम अपूर्ण; व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान
बायपास रस्त्याचे काम अर्धवट ठेवण्यात आले असून, यासाठी अनेक व्यापाऱ्यांची घरे तोडून घेण्यात आली. मात्र त्यांचे मोबदले आजतागायत दिलेले नाहीत. संरक्षण भिंतींचे वचन दिले गेले होते, पण प्रत्यक्षात कोणतीही कृती झालेली नाही. परिणामी, धान्य दुकान, बँक, क्लासेस, शासकीय गोदामे अशा अनेक व्यावसायिक ठिकाणी येणे अशक्य बनले आहे.
कसबा येथील तक्रारींचीही दखल नाही
कसबा ग्रामपंचायतीने आणि स्थानिक नागरिकांनी पालकमंत्र्यांच्या जनतेच्या दरबारात रस्ता व संरक्षण भिंतीसाठी निवेदन दिले होते. आठ दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले, पण प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झाली नाही. दरम्यान, शास्त्री पुलावर दरड कोसळल्यामुळे गंभीर अपघात घडला. या अपघातानंतरही जागेवर भिंत बांधण्यात आलेली नाही.
नागरिकांची मागणी
- ठेकेदारावर तात्काळ कारवाई करा
- गटारांची तातडीने व्यवस्था करावी.
- बाजारपेठेतून चिखल हटवण्याचे तातडीने काम सुरू करावे.
- संरक्षण भिंती व रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे.
- ठेकेदार आणि संबंधित इंजिनिअर यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
संगमेश्वरमधील नागरिक आणि व्यापाऱ्यांचे हाल लक्षात घेता, प्रशासनाने आणि पालकमंत्र्यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.