(रत्नागिरी / प्रतिनिधी)
हापूसप्रमाणेच काजू पिकालाही यंदा हवामानाचा मोठा फटका बसला आहे. कीडरोग आणि प्रतिकूल हवामानामुळे काजू उत्पादनात जवळपास ४० टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र आयात कमी झाल्याने बाजारातील दर समाधानकारक राहिल्यामुळे बागायतदारांना थोडा दिलासा मिळाला आहे.
फेब्रुवारी अखेरीस सुरू झालेल्या काजू हंगामात सुरुवातीला दर १७५-१८० रुपये प्रति किलो इतका होता, जो नंतर घटून सध्या १५०-१५५ रुपये दरम्यान आहे. विशेषतः वेंगुर्ला ७ व ९ या जातीच्या काजू बींना हा दर मिळतो आहे. मात्र यंदा हवामानातील बदलामुळे बींचा आकार लहान झाल्याने व्यापारी त्यांची गणना गावठी प्रकारात करत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. कमी मेहनतीत उत्पन्न देणारे काजू पीकही आता हवामान बदलाच्या तडाख्यात सापडल्याचे यंदाचे चित्र आहे.