(चिपळूण)
मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असतानाच कापसाळ येथे दुर्दैवी अपघातात एका २२ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. मृत व्यक्तीचे नाव सिद्धेश दिलीप कवळकर (वय २२, रा. टेरव तांबडवाडी) असे आहे. गुरुवारी रात्री काम आटपून तो चिपळूणहून आपल्या गावी टेरव जात असताना महामार्गावर बिघडलेल्या अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रकला त्याच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सिद्धेशच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. ट्रक महामार्गावर विनाअनुदर्शन व अल्पदृष्यतेच्या ठिकाणी उभा असल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनास्थळी पोलिसांची तातडीने कारवाई
अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक अविनाश महाडिक यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा व शवविच्छेदनाची कार्यवाही केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे तालुका अध्यक्ष समीर काझी यांनी मृतदेह हलवण्यास पोलिसांना सहकार्य केले. अपघाताची बातमी टेरव गावात पोहोचताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, आणि परिसरात हळहळ व्यक्त झाली.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
सिद्धेश मागील दोन वर्षांपूर्वी पुणे येथून आपल्या गावी परतला होता आणि चिपळूणमध्ये स्लाइडिंग व बदली चालक म्हणून काम करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील व तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे. एकुलत्या एक मुलाचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्यामुळे कवळकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शुक्रवारी सकाळी टेरव येथील स्मशानभूमीत सिद्धेशचे अंत्यसंस्कार शोकाकुल वातावरणात करण्यात आले.