(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे भर पावसात सांडपाणी जाण्यासाठी जी पाईपलाईन टाकण्यात येत आहे, ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने व चुकीच्या वेळी टाकण्यात येत आहे. त्यामुळे साईटपट्टीवर प्रचंड खड्डे पडले आहेत व त्यामध्ये दुचाकी व इतर वाहने जाऊन अपघात होत असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे. तसेच मोठ्या अपघाताची भीती ही व्यक्त होत आहे. परंतु अशी भितीदायक स्थिती निर्माण झालेली असताना देखील स्थानिक प्रशासन म्हणून गणपतीपुळे ग्रामपंचायत याकडे अजिबात लक्ष द्यायला तयार नसल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.
भर पावसात चालू असलेले काम बंद करावे व खणलेली साईटपट्टी व इतर सर्व साईटपट्टी चांगल्या पद्धतीने बुजवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच सदर काम चाललेले आहे हे सार्वजनिक बांधकाम विभागाला मान्य आहे का? गणपतीपुळे हे तीर्थक्षेत्र असून पर्यटन स्थळ आहे याची जाणीव बांधकाम विभागाला आहे का ? आज गणपतीपुळे परिसरातील रस्ते रस्त्यांची अवस्था फार बिकट आहे. गाडी चालवताना व चालताना कसरत करावी लागते सर्व रस्त्यांना पडलेले खड्डे व त्या अनुषंगाने होणारे अपघात हे सर्व कधी थांबणार ग्रामपंचायत याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहे. भर पावसामध्ये होणारे हे काम बंद करून निदान स्थानिक ग्रामस्थांना तरी दिलासा द्यावा अशी प्रतिक्रिया गणपतीपुळे येथील व्यावसायिक कल्पेश सुर्वे यांनी व्यक्त केली.