(नाशिक / प्रतिनिधी)
मातृ-पितृ पाद्यपूजनाचा अत्यंत हृदयस्पर्शी सोहळा.. तितक्याच भक्तीपूर्ण वातावरणात झालेले सरस्वती विद्यारंभ पूजन.. पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी वृक्षारोपण आणि सीडबॉल उपक्रम.. भगवान श्रीकृष्णाच्या गोपालकाल्याची आठवण करून देणारा दुपारचा मांदियाळी कार्यक्रम… समाजप्रबोधनपर सादर झालेली नाटिका.. आणि विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव व प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धांचे नेटके आयोजन.. अशा बहुविध वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचा समावेश असलेले श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे मूल्य संस्कार शिबीर राज्याच्या ३७९ ठिकाणी अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले.
सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाने संपूर्ण राज्यभर अत्यंत नियोजनपूर्वक एक दिवसीय मूल्यसंस्कार शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराच्या ठरलेल्या रूपरेषेप्रमाणेच एकाच दिवशी, एकाच वेळी सर्वत्र शिबीर घेण्यात आले. सकाळी आठच्या भूपाळी आरतीनंतर मातृ -पितृ पाद्यपूजन आणि सरस्वती पूजनामध्ये हजारो बालकांनी आनंदाने सहभाग घेतला. हा कार्यक्रम भावपूर्ण झाला. आईवडील हे आपले प्रथम गुरू आणि माता सरस्वती ही विद्येची देवता असल्यामुळे सर्वप्रथम त्यांचे पूजन करून शिबिराला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
घरोघरी सुसंस्कारित पिढी घडावी..
घरोघरी सुसंस्कारित पिढी घडावी आणि त्यातून समाज अन् राष्ट्राचा अधिकाधिक विकास व्हावा या उद्देशाने बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे सातत्याने बहुविध स्तुत्य उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात येते. या समाजोपयोगी उपक्रमांचा एक भाग म्हणून दरवर्षी उन्हाळी आणि हिवाळी अशी दोन मूल्य संस्कार शिबिरे घेण्यात येतात. यावर्षी आठ जून रोजी राज्यभर घेण्यात आलेल्या शिबिरात हजारो मुले सहभागी झाली होती. त्याशिवाय सेवामार्गाच्या हजारो सेवाकेंद्रांमध्येही नियमितपणे शिशू संस्कार आणि बालसंस्कार वर्ग चालविले जातात.
गुरुपुत्र नितीनभाऊंच्या उपस्थितीत वाडीत शिबीर
गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री क्षेत्र नरसोबावाडी येथील सेवामार्गाच्या दत्तपीठावर भव्य मूल्यसंस्कार शिबीर पार पडले. यावेळी मूल्य संस्कार विषयांची प्रात्यक्षिके पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. शिबिरार्थी आणि प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी मूल्य संस्कार चळवळ अशाच पद्धतीने गतिमान करण्याची आवश्यकता आहे असे विचार मांडले. सायंकाळी शिबिराची सांगता झाली. पुढील हिवाळी शिबिरालाही आम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहू असे काहीसे भावुक होऊन शिबिरार्थींनी सांगितले. सांगतेचा सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला. शिबिराला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये विद्यार्थी-पालक समुपदेशन घेण्यात आले. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.