(रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी)
रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल असलेल्या एका तरुण रुग्णावर अज्ञात इसमाने गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मनोरुग्णालयाच्या सुरक्षिततेबाबत आणि रुग्णांच्या देखरेखीच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
फिर्यादी शरिफा मुनाफ फणसोपकर (वय ४५, रा. राजीवडा नाका, कौशल्य प्लाझा, रत्नागिरी) यांच्या मन्नान मुनाफ फणसोपकर (वय २३) या मुलावर मनोरुग्णालयात उपचार सुरू असताना, दिनांक ६ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या आधी अज्ञात इसमाने अनोळखी कारणावरून त्याच्यावर अचानक हल्ला केला. या मारहाणीत मन्नानच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याचा जबड्याचे हाड मोडल्याचे निष्पन्न झाले आहे. प्राथमिक उपचार सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे करण्यात आले. मात्र जखम गंभीर असल्याने त्याला तातडीने वालावलकर हॉस्पिटल, डेरवण येथे हलवण्यात आले. दरम्यान मतिमंत तरुणाच्या आईने शहर पोलिस ठाणे गाठत तक्रार अर्ज दिल्यानंतर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४७/२०२५, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम ११७(१), ११७(२), व ११५(२) नुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या धक्कादायक घटनेनंतर मानसिक रुग्णांसाठी कार्यरत असलेल्या रुग्णालयात सुरक्षिततेचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेचा गंभीर पैलू म्हणजे मनोरुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणाच कार्यरत नाही! कोण, केव्हा, कुठून घुसतो आणि काय करतो, याचा कुठलाही नोंदमास रुग्णालय प्रशासनाकडे नाही का? सर्वसामान्य रुग्णालयात कुणीही सहजपणे घुसू शकतो, हेच दाखवणारी ही घटना. मानसिकदृष्ट्या अस्थिर रुग्णांमध्ये एखादा हल्लेखोर फिरतो आणि रुग्णाला गंभीर इजा करून निघून जातो, आणि कोणालाही त्याचा पत्ता लागत नाही ही बाब अत्यंत धोकादायक आहे.
अधीक्षक डॉक्टर फुले यांचे अपयश पुन्हा एकदा ठळक
या रुग्णालयाच्या अधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या डॉ. फुले यांच्यावर पूर्वी जिल्हा रुग्णालयामध्येही कामकाजातील ढिसाळपणाबाबत ताशेरे ओढले गेले होते. त्याच ढिसाळ कारभारामुळे तिथला रुग्णालयाचा दर्जा खाली घसरल्याचे बोलले जात होते. आश्चर्य म्हणजे, त्याच अधिकाऱ्यांची नंतर मनोरुग्णालयात अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली. मात्र येथेही काहीच बदल न झाल्याचे याच प्रकरणावरून स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे मनोरुग्णालयातील सुरक्षा यंत्रणा, सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक, रुग्णांचे निरीक्षण याबाबत कोणतीही ठोस योजना नसल्याचे यातून समोर आले आहे. हे अपयश थेट रुग्णालय अधीक्षकांवर जाते. सुरक्षा व्यवस्था, देखरेख आणि रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासकीय यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी दाखल झाल्यानंतर अशा प्रकारची हिंसक घटना घडणे अत्यंत धक्कादायक आणि दुर्भाग्यपूर्ण आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका रुग्णाला गंभीर इजा सहन करावी लागल्याने, जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
गंभीर मारहाणीचा प्रकार पोलिसांच्या नजरेआड कसा गेला?
या घटनेतील एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक बाब म्हणजे, एवढा गंभीर प्रकार घडूनही पोलिस प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय राहिले आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो आहे की, गंभीर मारहाणीचा प्रकार पोलिसांच्या नजरेआड कसा गेला? जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगून त्याला तातडीने डेरवणला हलवण्यास सांगितले. जबड्याला दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे, म्हणजे ही साधी दुखापत नव्हती, ही हिंसक मारहाणीची स्पष्ट लक्षणे होती. अशा अवस्थेत सरकारी रुग्णालयात कोणताही रुग्ण दाखल झाला, तर पोलीस यंत्रणेला आपोआपच माहिती मिळावी आणि चौकशी सुरू व्हावी, हे प्रशासनाचे कर्तव्य असते. मात्र, येथे ना पोलिसांनी दखल घेतली, ना चौकशी सुरू केली. या गंभीर प्रसंगावर रुग्णाच्या आईने स्वतः पोलिसांकडे लेखी अर्ज दिला. मात्र एवढं होऊनही, पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेतल्याचे कोणतेही संकेत नाहीत. एका मतिमंद तरुणाचा जबडा फाटेपर्यंत मारहाण होते आणि पोलिस प्रशासन फक्त निवेदनाची वाट पाहत बसलेले दिसते हे अत्यंत लाजिरवाणं चित्र आहे. याकडे तत्काळ जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.