(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील ओझर ते ओणी रस्त्यावर मौजे तिवरे (खरब) येथे भरदिवसा बिबट्याच्या हल्ल्यात एक महिला जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज गुरुवारी, १२ जून रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.
ओझर येथील रहिवासी श्री. मनसूर अकबर मापारी हे पत्नी आणि मुलासह त्यांच्या दुचाकी (MH08/2823) वरून मौजे राजापूर येथे जात असताना तिवरे (खरब) गावाजवळ त्यांच्या पत्नी श्रीमती अमिना मनसूर मापारी यांच्यावर बिबट्याने अचानक झडप घातली.
या हल्ल्यात श्रीमती मापारी यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याखाली बिबट्याचे नख लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने ओणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, अशी माहिती वनविभागाने दिली.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वनपाल जयराम बावदाणे, वनरक्षक विक्रम कुंभार आणि नितेश गुरव यांनी घटनास्थळाची पाहणी करून संबंधितांचे जबाब नोंदवले आहेत.
वन्यप्राणी दिसल्यास किंवा अशा प्रकारच्या घटना घडल्यास नागरिकांनी तत्काळ वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी-चिपळूण) गिरिजा देसाई यांनी केले आहे.