(रत्नागिरी)
रत्नागिरी एस.टी. आगारात सध्या चालक-वाहक यांच्यासह तब्बल ९४० पदे रिक्त असून त्यामुळे बससेवा विस्कळीत झाली आहे. ही पदे भरावीत, यासाठी विभाग नियंत्रक प्रशेष बोऱसे यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्त पदांचा प्रस्ताव राज्य परिवहन महामंडळाकडे पाठवण्यात आला आहे. ही भरती लवकरात लवकर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एस.टी. सेवेचा कणा असलेले चालक-वाहक पद रिक्त राहिल्यास ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल ओघानेच वाढतील. रिक्त पदांमध्ये चालक, वाहक-५४५, लिपिक-५०, यांत्रिक-३२०, वाहतूक नियंत्रक -२० अशी एकूण ९४० पदे रिक्त आहेत. त्यामुळे या पदांची भरती तातडीने करून बससेवा पूर्ववत सुरळीत करावी, अशी प्रवाशांची ठाम मागणी आहे. रिक्त पदांमुळे बससेवांमध्ये सातत्याने अडथळे निर्माण होत आहेत. चालक आणि वाहक नसल्यानं नियोजित फेऱ्या रद्द केल्या जात आहेत किंवा उशिरा सुटतात. परिणामी प्रवाशांना फटका बसत आहे.
विभागीय नियंत्रक प्रशेष बोऱसे यांनी सांगितले की, रिक्त पदांची भरती तातडीने व्हावी, यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच महामंडळाच्या वरिष्ठ पातळीवर याबाबत सकारात्मक हालचाल सुरु आहे. दरम्यान, नियोजित फेऱ्यांची अंमलबजावणी सुरळीत करण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना केल्या जात आहेत.
राजापूर-लांजा मार्गावरील बस फेऱ्या सोडण्याचे आदेश
रत्नागिरीसह इतर आगारांतून येणाऱ्या एस.टी. बस फेऱ्या वेळेवर पोहोचत नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून रत्नागिरी आगारातील विभागीय नियंत्रकांनी राजापूर व लांजा मार्गावरील बस फेऱ्या वेळेवर सुटाव्यात, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. काही तांत्रिक अडचणी, कर्मचारी कमतरता आणि आगारातूनच निघणाऱ्या बसेस वेळेवरच न सुटल्याने ही विसंगती निर्माण होत आहे.