(रत्नागिरी)
शहरातील कीर्तीनगर परिसरात भाड्याने राहणाऱ्या तरुणाच्या घरातून साडेसात लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी प्रदीपसिंह मलखमसिंग यादव (रा. उत्तर प्रदेश) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही चोरी रविवार, १ जून रोजी सकाळी ५ ते १०.३० या वेळेत घडली. या बाबत मोहम्मद आलम समसाद खान (वय २७) यांनी सोमवार, ९ जून रोजी दुपारी ३.१६ वाजता शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि संशयित हे दोघेही आसिफ मोटलानी यांच्या मालकीच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होते. घटनेच्या दिवशी, संशयित प्रदीपसिंह यादव याने खान यांची ७ लाख ५० हजार रुपये रोख असलेली बॅग चोरून नेल्याचा आरोप आहे.
फिर्यादीच्या अनुपस्थितीचा फायदा घेत संशयिताने ही चोरी केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.