(रत्नागिरी)
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनधिकृत व धोकादायक होर्डिंग हटविण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेने तातडीने कारवाईला सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत शहरातील एकूण ४८ होर्डिंग हटविण्यात आले आहेत.
मुंबई व पुण्यासारख्या शहरांमध्ये वादळी वाऱ्यांमुळे होर्डिंग कोसळून अपघात झाल्याच्या घटनांची गंभीर दखल घेत पालकमंत्री सामंत यांनी नुकत्याच पार पडलेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत सर्व अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग तात्काळ हटवण्याचे निर्देश दिले होते.
रत्नागिरी नगर परिषदेच्या पाहणीत शहरात एकूण १९० अधिकृत होर्डिंग असल्याचे स्पष्ट झाले असून त्यापैकी २० होर्डिंग धोकादायक अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय ४० अनधिकृत होर्डिंगही आढळली आहेत.
सोमवारपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली असून आतापर्यंत ४० अनधिकृत आणि ८ धोकादायक अधिकृत होर्डिंग हटविण्यात आली आहेत. मारुती मंदिर, माळनाका, जयस्तंभ या परिसरात ही कारवाई सुरू असून मोठ्या क्रेनच्या साहाय्याने ही होर्डिंग उतरवली जात आहेत. ही मोहीम मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या नेतृत्वाखाली राबवली जात आहे.