(गुहागर)
“आधुनिक तंत्रज्ञान व सुधारित बी-बियांचा वापर करून कोकणात सामूहिक शेती करणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी केले.
कोकणात पारंपरिक शेती हा मुख्य उद्योग होता. आंबा, काजू, नारळ, सुपारी आणि कोकम यांसारख्या फळबागांचा जोडधंदा यास पूरक होता. त्याकाळी एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे मनुष्यबळ मुबलक होते. शेती, सण-उत्सव, संस्कार यामध्ये सातत्य व परंपरेचा प्रभाव होता. मात्र, काळानुरूप विभक्त कुटुंब पद्धती, बदलती जीवनशैली, शिक्षणातील बदल आणि रोजगाराच्या निमित्ताने तरुणांची शहरांकडे होणारी स्थलांतराची वाढ यामुळे कोकणातील शेती अडचणीत सापडली आहे.
शेतीची जमीन तुकड्यांमध्ये विभागली गेल्याने उत्पादनक्षमतेवर परिणाम झाला आहे. शिवाय वन्यप्राण्यांचा – विशेषतः माकडे, वानर, रानडुकर यांचा – वाढता त्रास शेतीस मोठा धोका बनला आहे. वन विभागाकडून फक्त जनगणना केली जात असली, तरी ठोस उपाययोजना दिसून येत नाहीत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत आणि काही वेळा स्वसंरक्षणासाठी कठोर पावले उचलावी लागतील अशी स्थिती निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर सरपंच आंबेकर म्हणाले, “वाडीतील शेतकरी एकत्र येऊन सामूहिक शेती करणे हेच उत्तम उत्तर आहे.” पूर्वी पावसाळ्यात घराणी मिळून शेती करायची पद्धत होती. आता तीच संकल्पना पुन्हा नव्या रूपात स्वीकारण्याची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बी-बिया, ट्रॅक्टरसारखी साधने आणि कृषी विभागाचे मार्गदर्शन यामुळे सामूहिक शेती अधिक फायदेशीर ठरू शकते.
शेतीसाठी मचाण, रात्रंदिवस राखण, पीकांचे वेळेवर नियोजन आणि उत्पन्नाचे पारदर्शक वाटप असे उपाय सामूहिक पातळीवर राबविल्यास शेतीचे संरक्षण व नफा या दोन्ही बाबतीत सकारात्मक बदल घडू शकतो. कोकणातील शेतीचे पुनरुज्जीवन सामूहिक प्रयत्नातूनच शक्य आहे, असा ठाम विश्वास जनार्दन आंबेकर यांनी व्यक्त केला.