(इंदौर)
इंदौरच्या सहकार नगरमधील प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील तरुण राजा रघुवंशीच्या निर्घृण हत्येने संपूर्ण देश हादरून गेला आहे. अवघ्या १२ दिवसांच्या संसारानंतर एका नवविवाहित तरुणाचा खून होतो आणि त्यामागेच त्याची पत्नी असल्याचं उघड होतं, ही घटना मन सुन्न करणारी आहे.
मॅट्रिमोनियल वेबसाइटवर ऑनलाईन ओळख आणि अरेंज मॅरेज
राजा आणि सोनम यांची पहिली ओळख १ ऑक्टोबर २०२४ रोजी एका मॅट्रिमोनियल वेबसाइटवर झाली होती. दोघांनी एकमेकांना पसंत केलं आणि कुटुंबाच्या संमतीने ११ मे २०२५ रोजी पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. राजाची आई उमा रघुवंशी यांनी यास अरेंज मॅरेज असल्याचं स्पष्ट केलं असून, लग्नाआधी कोणतेही प्रेमसंबंध नव्हते, असं त्यांनी सांगितलं. राजा रघुवंशी हा आपल्या तिघा भावांपैकी धाकटा मुलगा होता. तो कुटुंबाच्या ‘रघुवंशी ट्रान्सपोर्ट’ या कंपनीचे काम करत होता. ही कंपनी शाळा व कोचिंग क्लासेसना भाड्याने बस पुरवते. 2007 पासून सुरू असलेल्या या व्यवसायात राजा अत्यंत जबाबदारीने काम करत होता.
सोनमचं प्रेमसंबंध आणि पूर्वनियोजित कट
सोनम रघुवंशी ही प्लायवुड फॅक्टरीचे मालक देवीसिंह रघुवंशी यांची मुलगी असून तीही कुटुंबाच्या व्यवसायात सक्रिय होती. पोलिस तपासात उघड झालं की, काही वर्षांपूर्वी तिच्या फॅक्टरीत काम करणारा राज कुशवाह नावाचा युवक तिचा प्रियकर होता. तो सोनमपेक्षा पाच वर्षांनी लहान असून, लग्नानंतरही त्यांच्या प्रेमसंबंधाचा तपासात खुलासा झाला आहे. सोनम आणि तिच्या प्रियकराने मिळून हा खून करण्याचा कट रचल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या दोघांनी काही सुपारी किलर्सच्या मदतीने राजाची हत्या केली.

हनिमूनचा बहाणा आणि मृत्यूचा प्लॅन
लग्नानंतर सोनमने हनीमूनसाठी शिलाँगचं तिकीट स्वतः बुक केलं. राजाला लगेच फिरायला जाण्याची इच्छा नव्हती. उलट त्याने आईला सांगितलं होतं की, “अजून कामं आहेत, नंतर जाईन.” पण सोनमच्या आग्रहामुळे त्याला जावे लागलं. “सर्व प्लॅनिंग सोनमचं आहे, मला काही माहिती नाही,” असं त्याने आईला सांगितलं होतं. राजाच्या आई उमा रघुवंशी यांनी सांगितलं की, “सोनमच्या कुटुंबीयांनीच लग्नासाठी पुढाकार घेतला होता. राजा लग्नानंतर खूप आनंदात होता. मात्र हनिमूनचा प्लॅनही सोनमनेच बनवला होता. राजाला हनीमूनची कोणतीच माहिती नव्हती. सोनमच्या आईने मला सांगितलं होतं की, लग्नापूर्वी मुलगा-मुलगी भेटण्याबाबत त्यांच्या कुटुंबाचा विरोध आहे. लग्नापूर्वी मुलगा-मुलगी भेटणं सोनमच्या वडिलांना आवडत नाही.” राजा आणि सोनमचं लग्न या जोडप्याच्या आणि दोन्ही कुटुंबांच्या संमतीने पारंपरिक पद्धतीने झालं होतं. लग्नानंतर सोनमचं वर्तन त्यांच्या कुटुंबासोबत चांगलं होतं. ज्यामुळे त्यांना तिच्यावर कोणताही संशय आला नाही. उमा म्हणाल्या, “माझा मुलगा लग्नानंतर खूप आनंदी होता. त्याने सोनमला आपली पत्नी म्हणून मनापासून प्रेम केलं होतं. आम्हाला तर अजूनही विश्वास बसत नाही की ती आपल्या पतीची हत्या घडवून आणू शकते. माझं मूल अविवाहित राहिलं असतं तर बरं झालं असतं, कारण त्याचा जीव तरी वाचला असता.” असं ही त्या म्हणाल्या.
२० मे रोजी दोघं मेघालयात पोहोचले. २२ मे रोजी मावलखियाट गावात त्यांनी भाड्याच्या स्कूटरने प्रवास केला. नंतर नोंग्नियाट गावातील लिविंग रूट्स ब्रिज पाहण्यासाठी गेले आणि शिपारा येथे थांबले. २४ मे रोजी चेकआउटनंतर दोघेही बेपत्ता झाले. त्याच दिवशी त्यांची स्कूटर शिलाँग-सोहरा मार्गावर एका कॅफेजवळ सापडली. २ जून रोजी वेईसावडॉन्ग धबधब्याजवळ खोल दरीत राजाचा मृतदेह आढळला. त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचं पोस्टमार्टम अहवालात स्पष्ट झालं.
गुन्ह्यातील अटक आणि तपासाची दिशा
राजाच्या हत्येनंतर सोनम गाझीपूरमध्ये लपली होती. ९ जून रोजी पोलिसांनी तिला अटक केली. पोलिसांनी याप्रकरणी तिला ट्रांजिट रिमांडवर घेण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान, आनंद नावाच्या चौथ्या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपी इंदौर येथून पकडले गेले आहेत.
सोनमची पाठवणी 31 मे पूर्वी नको, अन्यथा…
या घटनेबाबत आणखी एक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे या लग्नाबाबत ज्योतिषाने अगोदरच काही भाकीत केले होते. जेभाकीतं अगदी तंतोतंत खरे ठरले आहे. ज्योतिषी एनके पांडे यांनी संबंधित आरोपी सोनम आणि तिचा पती राजा यांच्या कुंडल्या लग्नासाठी जुळवल्या होत्या. त्यावेळी दोघांच्याही कुंडलीत मंगळ दोष होता. जर वधू आणि वर मंगळ असणारे असतील तर ते दोष मानले जात नाही. त्याचबरोबर त्यांच्या लग्नाची तारीख अगोदर 16 मे 2025 होती त्यानंतर काही कारणांमुळे हे लग्न 11 मे रोजी करण्यात आलं.
मात्र तरी देखील सोनमची माहेरून सासरी पाठवणी ही 31 मे पूर्वी करू नका. 31 मे रोजी दुपारी किंवा सायंकाळी तिची पाठवणी करा असेही त्यांनी सांगितलं. मात्र हे न ऐकता तिच्या घरच्यांनी लग्नाच्या तीन दिवसातच तिची पाठवणी केली. त्यानंतर लगेचच सोनम आणि तिचा पती राजा हे हनिमूनला जाताच बेपत्ता झाले. त्यावेळी घरच्यांनी पुन्हा एकदा या ज्योतिषाकडे जाऊन त्यांचा सल्ला घेतला. त्यावेळी त्यांनी सोनमचा फोटो दारावर उलटा लटकवण्यास सांगितलं जेणेकरून ती परत येईल.
त्याचबरोबर ज्योतिषी एनके पांडे यांनी या प्रकरणात आणखी भाकीतं केले होते. ज्यामध्ये त्यांनी पाच जून पर्यंत राजा आणि सोनमला कुठेही बाहेर जाण्यास मनाई केली होती. मात्र त्या दोघांनी हनिमून प्रवासाची योजना आखली. पण दारावर फोटो उलटा लटकवल्याने सोनम जिवंत परतली. सनमचे वडील देवीसिंह रघुवंशी यांनी सांगितले की, लग्नानंतर जावयाला दीड महिना घराबाहेर पडता येणार नाही. म्हणून त्यांनी 5 जूनचा शुभ मुहुर्त काढला होता. परंतु 21 मे रोजी सोनम आणि राजा कामाख्या देवीला निघाले होते.