(मुंबई / प्रतिनिधी)
परमार्थ साधण्यासाठी आपले आचरण अत्यंत महत्त्वाचे असून अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ साधता येतो. त्याकरिता सतत भगवंताचे अनुसंधान ठेवायला हवे. भगवंताशी एकरूप असायला हवे, असे मौलिक विचार श्री अक्कलकोट स्वामी समर्थांचे निस्सीम उपासक, थोर अधिकारी पुरुष, गुरुवर्य श्री.नाथस्वामी यांनी मांडले तेव्हा उपस्थित सारे भक्त भारावून गेले.
मुंबईतील लोअर परळ डिलाईल रोड येथील नाथस्वामी बेकरी मठात सद्गुरु श्री नाथस्वामींचा सत्संग अपूर्व उत्साहात पार पडला. आपल्या ओघवत्या शैलीत नाथस्वामींनी भक्तांच्या आध्यात्मिक प्रश्नांनाही समर्थक उत्तरे दिली. सत्संगात हितगुज साधताना ते म्हणाले की, प्रपंचात राहून परमार्थ साधता येतो. त्याकरिता बाहेर कुठेही जाण्याची गरज नाही. मात्र प्रपंचात आसक्ती असू नये. भगवान श्री दत्तात्रयांचे माता पिता अत्री – अनसूया या थोर दाम्पत्यानेही संसारात राहूनच परमार्थ साधलाच ना! अध्यात्मात अशी कितीतरी उदाहरणे देता येतील, असे सांगून ते म्हणाले की, परमार्थात मनाला कष्ट द्यावे लागतात. मनाच्या सवयीच्या उलट दिशेने जावे लागते. सर्व काही तू (भगवंत) आहेस हा पवित्र भाव असायला हवा. आतून भगवंताचे अनुसंधान हवे. ही सुरुवात स्वतःपासून करायला हवी. ही पवित्र भावना असेल तरच भगवंताशी एकरूप होता येते असे त्यांनी स्पष्ट केले.
जबसे जागे तबसे सवेरा….!
आपण बाहेरच्या आकर्षणाला भुलून फसतो. त्यासाठी विवेक सतत जागरूक ठेवायला हवा. आपल्या वृत्ती आवरून घ्यायला हव्यात. सद्सद्विवेकबुद्धी सतत जागृत ठेवली की फसगत होत नाही. योग्य निर्णय घेता येतो. सोबत प्राणायाम केल्याने सतत भरकटणारे मन एकाच जागी स्थिर राहते. स्थिर मनामुळे योग्य निर्णय घेण्याची सवय लागते. मनाला स्थिर ठेवण्यासाठी दररोज प्राणायाम आणि ध्यान अवश्य करा असा महत्त्वपूर्ण उपदेश श्री नाथस्वामींनी केला.
आपल्या पूर्वआयुष्यात काय झाले याचा कोळसा उगाळत बसण्यापेक्षा योग्य तो बोध घेऊन पुढे वाटचाल केली पाहिजे. जबसे जागे तबसे सवेरा.. या उक्तीनुसार भगवंताला शरण जाऊन प्रपंचात कोणत्याही गोष्टीचा अट्टाहास आणि आसक्ती न ठेवता निष्काम भावनेतून दैवी कार्य करा, जे नशिबात आहे ते मिळणारच आहे. त्यासाठी परमेश्वराकडे हट्ट का बरं करावा? छोट्या ,छोट्या भौतिक गोष्टी मागण्यापेक्षा त्या परमेश्वरालाच मागा.. एकदा का तो भगवंत तुमचा झाल्यास कोणत्याही क्षुल्लक गोष्टींची आसक्तीच शिल्लक राहणार नाही. मात्र ही उंची गाठण्यासाठी सतत भगवंताचे अनुसंधान ठेवा, कारण भगवंताजवळ जाण्याचा सोपा मार्ग म्हणजे अनुसंधान आणि सद्गुरु आहे. सद्गुरु आणि जपमाळ हे आपल्याला परमेश्वराशी जोडण्याचे कार्य करतात असे मार्गदर्शन सद्गुरु नाथस्वामींनी केले तेव्हा उपस्थित सारे भाविक मंत्रमुग्ध झाले.