(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १५० दशलक्ष घनमीटर अधिक पाणीसाठा उपलब्ध असून, सद्यस्थितीत १० जूनपर्यंत पुरेल इतका साठा आहे. त्यामुळे सध्या दर सोमवारीच दुरुस्तीसाठी पाणी कपात करण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
रत्नागिरी शहरात दररोज सुमारे १८ ते १९ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जातो. प्रत्येक प्रभागात दीड तास पाणीपुरवठा सुरू असून, नागरिकांना नियमित पुरवठा मिळत आहे. गेल्या वर्षी एप्रिलपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र यंदा धरणात समाधानकारक साठा असल्याने सध्या तरी कपात होणार नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
अत्यधिक तापमानामुळे साठवलेले पाणी झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शहरातील विविध प्रभागांत पाणीपुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी २१ लाइनमन आणि १५ देखभाल कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दर सोमवारी दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतो.
पाणीटंचाई टाळण्यासाठी योग्य नियोजन करून नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पालिका सज्ज असून, उपलब्ध साठ्याच्या आधारे पुढील निर्णय घेतले जातील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.