(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी तालुक्यातील पुनस तिठा परिसरात रस्त्यावर बिबट्याचे पिल्लू आढळल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. भर रस्त्यात हे पिल्लू दिसल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली, तर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, बिबट्याचे पिल्लू हे वाघाचे असल्याची अफवा गावात पसरली आणि ही बाब सोशल मीडियावरही पसरताच पुनस आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. अनेकांनी पिल्लाचे फोटो आणि व्हिडिओ शूट करत सोशल मीडियावर प्रसारित केले.
सायंकाळी उशिरा काही जागरूक नागरिकांनी याची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पिल्लाच्या सुरक्षिततेची तसेच लोकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याची कार्यवाही सुरू केली.
सदर पिल्लू एकटे सापडल्याने परिसरात मादी बिबट्या जवळपासच असण्याची शक्यता वनविभागाने वर्तवली असून, नागरिकांनी जंगल परिसरात जाऊ नये आणि सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.