(रत्नागिरी)
तालुक्यातील आरे समुद्रकिनारी रविवारी सायंकाळी तीन पर्यटक समुद्रात बुडाले होते. भरतीच्या वेळी समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या या तिघांना समुद्रातील भोवऱ्यांमुळे ओढले गेले. मात्र किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या सतर्क आणि धाडसी स्थानिकांनी तात्काळ धाव घेत त्यांचे प्राण वाचवले.
आरेवारे किनाऱ्यावर मागील काही दिवसांत पर्यटकांची गर्दी लक्षणीय वाढली आहे. प्रशासनाच्या स्पष्ट सूचनांकडे दुर्लक्ष करून अनेक पर्यटक उधाणाच्या समुद्रात उतरत आहेत. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तीन पर्यटक भिजण्यासाठी समुद्रात उतरले. भरतीमुळे निर्माण झालेल्या भोवऱ्यात सापडून ते समुद्रात ओढले गेले.
बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. यावेळी किनाऱ्यावर उपस्थित श्रेयस पवार, अर्पित भोसले, सुरज चव्हाण, ओंकार सागवेकर, आदित्य पाटील, पोलिस पाटील आदेश कदम, श्लोक पाटील आणि सुयोग भाटकर यांनी प्रसंगावधान राखत धाडसाने समुद्रात उडी घेतली आणि या तिघांना सुखरूप किनाऱ्यावर आणले.
स्थानिकांच्या वेळीच दिलेल्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला असून, संबंधित पर्यटकांची प्रकृती सध्या स्थिर आहे. दरम्यान, प्रशासनाने पुन्हा एकदा नागरिक आणि पर्यटकांना समुद्रात न उतरण्याचे आवाहन केले आहे.