( रत्नागिरी )
पंढरीची वारी ही शिस्तप्रिय असते. हजारो वारकरी ऊन, वारा, पाऊस झेलत, पायी चालत असतात. ट्रॅफिक जॅम सोडाच पण ॲम्ब्युलन्स आली तरी लाखो वारकरी एका मिनिटात त्या ॲम्ब्युलन्सला जायला वाट मोकळी करून देतात, महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या आषाढी वारीबद्दल महाराष्ट्राबाहेरून येणाऱ्यांनी भाष्य करू नये, अशा शब्दांत रत्नागिरीतील युवा नेते आणि विठ्ठल भक्त अमृत गोरे यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला.
युवा नेते अमृत गोरे हे आपल्या महाविद्यालयीन जीवनापासून अनेक वर्षे न चुकता पंढरीची वारी करत आहेत. त्यामुळे त्यांना वारकरी संप्रदायाचा जवळून परिचय आहे. समाज कार्यातही ते नेहमी पुढे असतात. अशा परिस्थितीत अबू आझमीची यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या ‘वारी’ वर बोलण्याचा काहीही अधिकार नाही आणि आम्ही हे खपवून घेणार नाही. महाराष्ट्र सहनशील आहे, पण शिवरायांचं रक्तही आमच्यात आहे, हे विसरू नये, असेही गोरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
मी माझे शब्द मागे घेतो; अबू आझमींनी माफी मागितली
सोलापूरमध्ये मी केलेल्या एका वक्तव्यामुळे पसरलेल्या गैरसमजुतीबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो. माझे वक्तव्य तोडून मोडून आणि दुर्भावनापूर्ण पद्धतीने सादर केले आहे. माझ्या वक्तव्यामुळे वारकरी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर मी माझे शब्द पूर्णपणे मागे घेतो आणि सर्वांची माफी मागतो. माझा हेतू कधीही कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता, असे स्पष्टीकरण समाजवादी पक्षाचेआमदार अबू आझमी यांनी दिले. अबू आझमी यांनी पंढरपूर वारी पालखीबाबत केलेल्या विधानावरून राजकारण तापले होते. त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज त्यांच्या वक्तव्याबाबत माफी मागितली.
आझमी यांनी म्हटले की, मी एक समर्पित समाजवादी आहे आणि नेहमीच प्रत्येक धर्म, संस्कृती, सूफी संत आणि त्यांच्या परंपरांचा आदर करतो. वारी परंपरेचे पालन करणाऱ्या सर्व वारकरी बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो. ही परंपरा महाराष्ट्राच्या आंतरधर्मीय, समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसाचा अभिमानास्पद भाग आहे, ज्याचा मी वैयक्तिकरित्या आदर करतो. मी वारी पालखीचा उल्लेख फक्त मुस्लीम समुदायाविरुद्ध आणि त्यांच्या हक्कांविरुद्ध भेदभावाच्या संदर्भात केला होता. ही कोणत्याही प्रकारची तुलना नव्हती. माझा हेतू आणि माझी मागणी कोणत्याही प्रकारे अयोग्य नव्हती. माझा एकमेव उद्देश सरकारचे लक्ष वेधून घेणे होता.
सरकारच्या दुटप्पीपणामुळे अल्पसंख्याक समुदायाच्या मनात अशी भावना निर्माण होऊ नये की, या देशात त्यांच्यासाठी वेगळे कायदे आहेत. तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः म्हणतात ‘सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास. आम्ही उपेक्षित समाजाच्या हक्कांसाठी, आदरासाठी आणि समानतेसाठी जोरदार लढत राहू, परंतु देशाच्या एकतेला कधीही बाधा पोहोचू देणार नाही.
वादग्रस्त विधान काय होते?
आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही, मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितले लवकर जाऊ अन्यथा पालख्यामुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही असे वक्तव्य अबू आझमी यांनी केले होते.