समाजाच्या पारंपरिक चौकटींना छेद देत आणि प्रेम व निष्ठेचा अनोखा आदर्श उभा करत, राजस्थान मधील डुंगरपूर जिल्ह्यातील गालंदर या आदिवासी गावात नुकताच एक विलक्षण विवाहसोहळा पार पडला. तब्बल ७० वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ९५ वर्षीय रामभाई खरारी आणि ९० वर्षीय जीवालीदेवी यांनी विवाहबंधनात अडकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
७० वर्षे लिव्ह-इनमध्ये राहत असलेल्या या प्रेमळ जोडप्याला आठ अपत्ये आणि नातवंडांचा मोठा परिवार असूनही त्यांनी आजवर विधीवत विवाह केला नव्हता. मात्र वयोमानानंतर त्यांनी अधिकृतरीत्या विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही या निर्णयाला संपूर्ण पाठिंबा दिला. दरम्यान, १ जून रोजी पारंपरिक हळदीचा कार्यक्रम पार पडला, तर ४ जून रोजी संपूर्ण गावाच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा साजरा करण्यात आला. लग्नापूर्वी पारंपरिक ‘बांदोली’ अर्थात मिरवणूक काढण्यात आली, ज्यात डीजेच्या तालावर गावकरी आणि कुटुंबीयांनी उत्साहात नृत्य केले.
विवाहादरम्यान, रामभाई आणि जीवालीदेवी यांनी विधीवत सात फेरे घेतले आणि नंतर संपूर्ण गावासाठी भोजनाचे आयोजन केले. त्यांच्या मुलगा कांतिलाल खरारी यांनी एनडीटीव्हीला सांगितले, “हे आमच्यासाठी एक भावनिक आणि ऐतिहासिक क्षण होते. आई-वडील खूप आनंदी आहेत, आणि आम्हीही.” गालंदर गावातील हा विवाह केवळ कौटुंबिक सोहळा न राहता, प्रेम, निष्ठा आणि समाजाच्या स्वीकारशीलतेचे प्रतीक ठरला आहे. सोशल मीडियावरही या जोडप्याच्या निर्णयाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.