(बावनदी/ दिनेश आंब्रे)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी- बावनदी दरम्यान आज सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान एक गंभीर अपघात झाला. रत्नागिरीकडे जाणारा एलपीजी गॅस टँकर (क्रमांक NH 01N 4628) आणि चिपळूणहून रत्नागिरीकडे येणारी मिनी बस यांच्यात जोरदार धडक झाली.
अपघातानंतर टँकरमधून गॅसची गळती सुरू झाली होती. घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दल तत्काळ दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आणि बचावकार्य सुरू आहे.
आज सकाळी सुमारे ८ वाजता, चिपळूणहून रत्नागिरीकडे निघालेली मिनी बसचा (वडाप गाडी) निवळी नजीक हा अपघात झाला. मागून भरधाव वेगाने येणाऱ्या गॅस टँकरने मिनी बसला जोरदार धडक दिल्याने बस सुमारे २० फूट खोल दरीत कोसळली.
ही मिनी बस चिपळूण-रत्नागिरी मार्गावर दररोज प्रवाशांची वाहतूक करत असते. मात्र आज सकाळी घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अपघातानंतर घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल व रुग्णवाहिका तातडीने दाखल झाल्या. या दुर्घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र नेमकी जखमींची संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही.
अनेक प्रवासी जखमी, दरीत कोसळली मिनी बस
धडकेनंतर मिनी बसचा चालक नियंत्रण गमावल्यामुळे बस खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले असून, रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवले जात आहे.
महामार्ग बंद, वाहनांच्या लांबच लांब रांगा
या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्ग दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आला आहे. परिणामी, दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलीस विभागाने वाहतूक नियंत्रण व मदत कार्य सुरू केले आहे.
गॅस गळतीमुळे भीतीचे वातावरण
गॅस टँकरमधून सुरू असलेल्या गळतीमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसर रिकामा करण्यात येत आहे.
या अपघातात २५ ते २६ प्रशिक्षणार्थी शिक्षक जखमी झाले असल्याची माहिती असून, त्यातील अनेकांचे प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हा अपघात बावनदी परिसरात सकाळी घडला. धडकेनंतर बसचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
जखमी शिक्षकांची नावे पुढीलप्रमाणे:
संतोष जागुष्टे (28), विराज राजाराम सावंत (41, रा. सावर्डे), मंदार सुखदेव खाडे (53), स्मिता मधुकर पाटील (48), उषा अमोल खुडे (38), जयश्री सुर्यकांत गावडे (54), प्रियंका दिलीप जाधव (38), स्नेहा संतोष मिस्त्री (47), धर्मेंद्र दत्तात्रय के देरुगडे (53), दिलीप ज्ञानेश्वर डोंगरे (53), सुलक्षणा संभाजी पाटील (40), निशिकांत दिनानाथवा वानरकर (51), रुपाली सुकांत यादव (50), हर्षाली हेमंत पाकळे (36), निता विनायक बांदरे (38), मिना सुभाष घाडगे (52), कमल किशोर महाडिक (37), प्रेमकुमार बबन शिवगण (35), अमोल गणेश कोनवाल (35), मनिषा संतोष कांबळे (47), मालिनी दिपक चव्हाण (40), श्वेता संजय चव्हाण (48), राजेश यादव (47), गणेश महादेव सावर्डेकर (45), सुरेंद्र दिपक सावंत (50), सचिन अशोक पोकळे (43), उदय पांडूरंग खताते (52), अरविंद अनंत सकपाळ (57), मिना विनायक शिरकर (38) आणि रोहित राजेंद्र चव्हाण (35) अशी अपघातामधील 30 जखमींची नावे आहेत.
जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे हलवण्यात आले आहे. सर्व शिक्षक हे देवरुख व संगमेश्वर परिसरातील असल्याची माहिती आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू असून टँकर चालक फरार असल्याची माहिती आहे.
( माहिती अपडेट करीत आहोत.)