भारतीय शेती मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक पावसावर अवलंबून आहे, विशेषतः खरीप हंगामात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हवामानात मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, तर कधी पावसाचा चुकलेला काळ – यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही धोक्यात आले आहे.
अशा वेळी शेतकऱ्यांना हवामानाची अचूक व तात्काळ माहिती मिळाली, तर ते योग्य वेळी शेतीसंबंधी निर्णय घेऊन मोठ्या नुकसानीपासून वाचू शकतात. ही गरज ओळखून भारतीय कृषी विभाग व भारतीय हवामान विभागाने एकत्रितपणे ‘मेघदूत’ नावाचे स्मार्टफोन ॲप विकसित केले आहे.
‘मेघदूत’ ॲपचे वैशिष्ट्ये:
- हवामानाचा अचूक आणि स्थानिक अंदाज (तापमान, पर्जन्यमान, आर्द्रता, वारा इ.)
- पिकांसाठी सल्ला – खत वापर, सिंचन, संरक्षण याबाबत मार्गदर्शन
- हवामानावर आधारित सल्ले दर मंगळवार आणि शुक्रवारी अपडेट होणारे
- १० प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध, मराठीतही सहज वापरण्याजोगे
- उपग्रह प्रतिमा व हवामान खात्याच्या ताज्या सूचनांचा समावेश
वापरण्याची पद्धत:
शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून ‘मेघदूत’ ॲप डाउनलोड करून, नाव, मोबाईल नंबर, भाषा व जिल्हा भरून नोंदणी करावी. त्यानंतर हवामान अंदाज, पावसाची शक्यता, पिकांवरील सल्ला, तसेच स्थानिक हवामान घटकांची माहिती सहजपणे ॲपवर पाहता येते.
मेघदूत का उपयुक्त?
आज हवामानातील अनिश्चितता वाढल्याने पिकांचेच नव्हे तर मानवी व जनावरांचेही प्राण धोक्यात येतात. अशा संकटप्रवण काळात ‘मेघदूत’ ॲप हे शेतकऱ्यांचे एक डिजिटल हत्यार ठरते. यामुळे वेळेवर सावधगिरी बाळगता येते, नुकसान टळते आणि पिकांचे उत्पादनही सुधारते.
शाश्वत शेतीकडे वाटचाल करताना, हवामान माहितीवर आधारित निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. ‘मेघदूत’ ॲप हे फक्त हवामानाचे ॲप नसून शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा आणि शाश्वत उत्पादनाचा आधार आहे. शेतकरी बांधवांनो, आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्या. ‘मेघदूत’ ॲप आजच डाऊनलोड करा आणि हवामानावर नियंत्रण मिळवा!