( जैतापूर / राजन लाड )
बकरी ईद (ईद-उल-अधा) सणाच्या पार्श्वभूमीवर नाटे सागरी पोलीस ठाण्याच्यावतीने नाटे व परिसरात भव्य रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. सणाच्या काळात कायदा व सुव्यवस्था रहावी, नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण व्हावा, तसेच शांततेचा संदेश पोहोचावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या रूट मार्चमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नाटे गावातील मुख्य रस्ते, बाजारपेठा, धार्मिक स्थळे आणि वस्ती भागांतून हा रूट मार्च काढण्यात आला.
मार्चदरम्यान पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधत सौहार्द जपण्याचे आवाहन केले. तसेच, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून सर्व भागांवर कडक नजर ठेवण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.
नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद
स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत करत सण शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे आश्वासन दिले. विविध समाजघटकांमध्ये बंधुता टिकवण्यासाठी पोलिसांचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरत असल्याचे नागरिकांनी नमूद केले.