(संगमेश्वर/प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गोळवली येथील काँक्रीटीकरण प्लांटजवळ साचलेल्या चिखलामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी सतत साचणाऱ्या चिखलामुळे रस्ता अत्यंत निसरडा झाला असून, दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे अपघात वाढले आहेत. तरीदेखील संबंधित बांधकाम विभाग आणि महामार्ग प्रशासनाने अद्याप या समस्येकडे दुर्लक्षच केले आहे, हे अधिकच धक्कादायक ठरत आहे.
स्थानिक रहिवाशांनी आणि प्रवाशांनी वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. या ठिकाणी वाहन घसरून पडण्याच्या अनेक घटना घडल्या असून, वाहतूकही अडथळाग्रस्त झाली आहे.
“मोठा अपघात झाल्यास जबाबदार कोण?”
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेत आमदारांचे लक्ष वेधण्याची मागणी केली आहे. “जर या ठिकाणी एखादा जीवघेणा अपघात झाला, तर त्याला संपूर्णतः बांधकाम विभाग जबाबदार असेल,” असा रोषही त्यांनी व्यक्त केला आहे.
प्रशासन आणि जनप्रतिनिधींनी तात्काळ पावले उचलावीत
रस्त्याची देखभाल, स्वच्छता आणि सुरक्षितता ही संबंधित विभागांची प्राथमिक जबाबदारी असताना याकडे वारंवार दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रशासनाने आणि स्थानिक आमदारांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना केल्या नाहीत, तर जनआंदोलन हाच पर्याय राहील, असा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला आहे.