(गणपतीपुळे / वैभव पवार)
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी केवळ दोन जीवरक्षक तैनात असल्याची गंभीर बाब “रत्नागिरी 24 न्यूज”ने उघड केल्यानंतर, ग्रामपंचायतीने त्याची तात्काळ दखल घेत उर्वरित चार जीवरक्षकांनाही समुद्रकिनारी पुन्हा नेमले आहे. त्यामुळे आता एकूण सहा जीवरक्षकांची उपस्थिती आज शुक्रवारपासून पुन्हा समुद्रकिनाऱ्यावर दिसून येत असून, पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत.
गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून एकूण सहा जीवरक्षक नेमलेले असून, ते समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेसाठीच असावेत, अशी अपेक्षा होती. मात्र यंदाच्या पावसाळी हंगामात फक्त दोन जीवरक्षक समुद्रकिनाऱ्यावर कार्यरत होते, तर उर्वरित चार जीवरक्षक वाहतूक नियंत्रणासाठी कोल्हटकर तिठा आणि आपटा तिठ्यावर नियुक्त करण्यात आले होते. विशेष म्हणजे, हे चार जीवरक्षक जीवरक्षक टी-शर्ट परिधान करून वाहतूक काम करत असल्याने नेमके ते वाहतूक रक्षक की समुद्र रक्षक? असा संभ्रम निर्माण झाला होता.
उन्हाळी पर्यटन हंगामाच्या अखेरीसच पावसाने जोर धरला असून, समुद्र किनारा खवळलेला आहे. याच पार्श्वभूमीवर जलक्रीडा प्रकारही बंद झाले आहेत, परिणामी पर्यटकांची पूर्ण जबाबदारी जीवरक्षकांवरच येऊन पडली. किनाऱ्यावरील लाटांचे पाणी थेट सुरक्षा भिंतीच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याने धोक्याचा स्तर अधिकच वाढला आहे. दरम्यान, दोन शिफ्टमध्ये प्रत्येकी फक्त एक जीवरक्षक असल्याने त्यांना संपूर्ण किनाऱ्यावर गस्त घालणे, सूचना देणे आणि खोल पाण्यात गेलेल्या पर्यटकांना बाहेर काढणे या जबाबदाऱ्यांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या.
“रत्नागिरी 24 न्यूज”च्या वृत्ताची तात्काळ दखल!
बुधवारी रत्नागिरी 24 न्यूजने “फक्त दोन जीवरक्षकांवर समुद्रकिनाऱ्याची सुरक्षा!” या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या विशेष वृत्तानंतर, ग्रामपंचायतीने तात्काळ पावले उचलली आणि शुक्रवारी सर्व सहा जीवरक्षकांची समुद्रकिनाऱ्यावर नियुक्ती करण्यात आली.
जीवरक्षक आणि पर्यटक दोघांचाही दिलासा
यामुळे आता प्रत्येक शिफ्टमध्ये किमान तीन जीवरक्षकांची उपस्थिती सुनिश्चित झाली आहे. चारही जीवरक्षकांना त्यांच्या मूळ जबाबदाऱ्या आणि पोशाखाशी सुसंगत काम पुन्हा मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त करत “रत्नागिरी 24 न्यूज”चे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची सुरक्षा अधिक बळकट झाली आहे. वेळेवर दखल घेतल्याबद्दल जीवरक्षकांकडून ग्रामपंचायतीचे ही आभार मानले जात आहेत.