(किल्ले रायगड)
६ जून रोजी किल्ले रायगडावर ३५२वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा अभूतपूर्व जल्लोषात पार पडला. देशभरातून लाखो शिवभक्त गडावर हजेरी लावत ‘याची देही, याची डोळा’ या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झाले. यावर्षीच्या सोहळ्याने मागील सर्व गर्दीचे विक्रम मोडीत काढले, अशी दृष्ये संपूर्ण गडावर पाहायला मिळाली.
पावसाळ्याच्या सुखद वातावरणात ढोल, ताशा, नगारे, कोकणातील पारंपरिक खालुबाजे, शिवकालीन वेषभूषेत सजलेले शिवभक्त—या सर्वांनी रायगडावर पुन्हा एकदा शिवकाल जिवंत केला. दोन दिवसांपासूनच गडावर विविध मर्दानी खेळ, पोवाडे, जागरण-गोंधळ यांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण रायगड जयघोषाने दुमदुमून गेला.
शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीच्यावतीने आयोजित या सोहळ्याच्या प्रमुख कार्यक्रमाची सुरुवात राजसदरेवर झाली. शिवराज्याभिषेक गीताने सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. विविध नद्यांमधून आणलेल्या पवित्र जलाने विधिवत पूजेसह शिवराज्याभिषेकाचा अभिषेक झाला. यावेळी खास उपस्थिती होती छत्रपती संभाजी राजे भोसले आणि युवराज शहाजीराजे भोसले यांची.
शहाजीराजेंच्या हस्ते ध्वजपूजन आणि ध्वजारोहण झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी राजसदरेवर आगमन करताच वातावरण जल्लोषाने भरून गेले. सिंहासनावरील मूर्तीस सुवर्णमुद्रांनी अभिषेक करण्यात आला. यावेळी संभाजी राजे भोसले यांनी आपल्या भाषणात हा सोहळा वैचारिक क्रांतीचे प्रतीक असल्याचे सांगितले. “शिवरायांचा विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात महाराजांचा समावेश गरजेचा आहे,” असे मत त्यांनी मांडले. त्यांनी शासनाकडून गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी असलेली उदासीनता स्पष्ट करत, “हे किल्ले आम्हाला द्या, आम्ही जपतो!” अशी मागणी केली. तसेच, हा दिवस ‘राष्ट्रीय दिन’ म्हणून साजरा व्हावा, अशीही त्यांची मागणी होती.
मनोज जरांगे पाटील यांची उपस्थिती:
मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. महाराजांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि आरक्षणासाठीचा लढा अधिक तीव्रतेने सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.
संघटनेचे अध्यक्ष संदीप खांडेकर यांनी सांगितले:
“६ जून ही फक्त तारीख नाही, ती निसर्गाच्या मनात कोरलेली आहे,” असे म्हणत संदीप खांडेकर यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ऐतिहासिक व वैचारिक महत्त्व अधोरेखित केले. “शासनाने वेळेवर गड संवर्धनासाठी निधी द्यावा, आणि शिवरायांविरोधात चुकीचे बोलणाऱ्यांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा,” अशीही त्यांनी मागणी केली.