(माणगाव)
मुंबई-गोवा महामार्गावरील टेमपाले येथील उड्डाणपुलावर गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. ट्रकने समोरून धडक दिल्याने एक कार पूर्णपणे चुराडून गेली. अपघात एवढा तीव्र होता की दोन्ही वाहने उड्डाणपुलावरून खाली कोसळण्याच्या उंबरठ्यावर आली होती. मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या घटनेत संजय चौधरी यांच्यासह साहिल धर्मेंद्रकुमार गुप्ता (वय १९), धनंजय चंद्रभान चौधरी (वय २० – दोघेही रा. वडाळा, मुंबई) आणि ट्रकचालक चंद्रकांत रामदास लडकत हे जखमी झाले. सर्व जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत जीवितहानी टळली असली तरी चार जण जखमी झाले आहेत.
अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. गोरेगाव पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, संजय चंद्रभान चौधरी (वय २२, रा. वडाळा, मुंबई) हे एमएच ०८ एएन ६७८५ या क्रमांकाची कार घेऊन मुंबईहून गोव्याकडे निघाले होते. दरम्यान, महाडहून माणगावकडे येत असलेल्या एमएच १२ एचडी ३८३३ या क्रमांकाच्या ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रकने कारला जोरदार धडक दिली आणि पुढे जाऊन थेट कारवर कोसळला.
अपघाताची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी ट्रकचालक चंद्रकांत लडकत याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पी. के. घोडके हे करीत असून, ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे आणि पोलीस उपनिरीक्षक एस. एन. रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.