(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी सध्या केवळ दोन जीवरक्षकांवर येऊन ठेपली आहे.
गणपतीपुळे ग्रामपंचायतीने समुद्रातील सुरक्षेसाठी नियुक्त केलेले उर्वरित चार जीवरक्षक कोल्हटकर तिठा आणि आपटा तिठा या मुख्य रस्त्यांवर वाहतूक नियंत्रणासाठी नेमले आहेत. त्यामुळे “जीवरक्षक समुद्रकिनाऱ्यासाठी की वाहतूक नियंत्रणासाठी?” असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
किनाऱ्यावर गस्त घालणारा फक्त एक जीव रक्षक
गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून एकूण सहा जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु यंदाच्या पावसाळी हंगामात समुद्र खवळलेला असताना देखील केवळ दोनच जीवरक्षक समुद्रकिनाऱ्यावर कार्यरत आहेत. त्यातही हे दोन जीवरक्षक दोन शिफ्टमध्ये कार्यरत असून, प्रत्येक सत्रात एकाच व्यक्तीवर संपूर्ण समुद्रकिनाऱ्याची जबाबदारी येते.
सध्या समुद्राच्या मोठमोठ्या लाटा थेट संरक्षण भिंतीपर्यंत पोहोचत असून खोल पाण्यात जाणाऱ्या पर्यटकांना सतर्क करण्याचे व त्यांना सुरक्षित किनाऱ्यावर आणण्याचे कठीण काम एका व्यक्तीला करावे लागते. यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
वाहतूक नियंत्रणात गुंतलेले जीवरक्षक, पोशाखही तोच!
ग्रामपंचायतीने वाहतूक नियंत्रणाच्या कामासाठी नेमलेल्या जीवरक्षकांना देखील ‘जीवरक्षक’ हा टी-शर्ट घालायला लावल्यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. पर्यटकांना हे कर्मचारी समुद्रकिनाऱ्याच्या सुरक्षेसाठी आहेत की वाहतूक नियमनासाठी, हेच कळेनासं झालं आहे.
जिवाची जबाबदारी – आणि नाराजीचा सूर
सुरक्षेच्या गंभीर जबाबदारीसाठी आवश्यक असलेले दर सत्रात किमान दोन जीवरक्षक उपलब्ध नसल्याने, उपस्थित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. काही पर्यटक सूचना ऐकतात, तर काही जण वाद घालतात. गंभीर प्रसंग घडल्यास एकट्या जीवरक्षकाला पर्यटक वाचवणे अशक्य होऊ शकते.
या अडचणीमुळे जीवरक्षकांमध्ये नाराजीचा सूर वाढत आहे, तर ग्रामस्थ व पर्यटक ग्रामपंचायतीच्या या अनागोंदी निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त करत आहेत.