( संगमेश्वर / प्रतिनिधी )
शालेय संस्कृती ही अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत लक्षणीय भूमिका बजावत असते.प्रभावी अध्यापनात शालेय संस्कृतीला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे शालेय संस्कृतीवरच विद्यार्थ्यांची प्रगती अवलंबून असते असे प्रतिपादन सुलभक सौ मानसी गानू यांनी केले. त्या वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या शिक्षकांना मार्गदर्शन करत होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना त्या पुढे म्हणाल्या की, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये शालेय संस्कृती व शालेय प्रक्रियेला फार महत्व आहे.या साऱ्याचा अभ्यास शिक्षकांचा असायला हवा असे नमुद केले.शाळेमध्ये विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,मुख्याध्यापक पालक आदी अनेक घटक असतात. हे घटक एकमेकांशी कसे वागतात,परस्पर आदर,सहकार्य,परस्पर संबंध,प्रतीके,व्यवस्था व पद्धती यावर शाळेतील वातावरण अवलंबून असते. या साऱ्या घटकांकडे विद्यार्थी सूक्ष्म पणे पहात असतो. हेच कळत नकळत विद्यार्थ्यांवर संस्कार होत असतात.त्यासाठी आदर्श शालेय संस्कृती निर्माण करणं हे शिक्षकांचं प्रमुख काम असल्याचे त्यांनी सांगितले.प्रभावी शालेय संस्कृतीमुळे उत्तम शैक्षणिक वातावरण निर्माण होते.अशा समृद्ध वातावरणात विद्यार्थी उत्साहाने, सक्रियपणे, व लक्षपूर्वक शिकण्यासाठी प्रवृत्त होतात, असे नमूद केले.
मूल्ये आणि स्वभाववृत्ती विकसन ह्या गोष्टी तासाला शिकवून होणाऱ्या नाहीत.तर त्या शाळेतील असलेल्या एकंदर वातावरणातून विद्यार्थी शिकत असतात. आपल्या समोर येणाऱ्या विद्यार्थ्याने विचार कसा करावा,त्याग म्हणजे काय?, तर्कशुद्धपणा म्हणजे काय?वैज्ञानिक दृष्टिकोन,सेवा, आदी अनेक मूल्ये शिक्षकांनी आवर्जून रुजवली पाहिजेत असे सांगितले.
विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, सर्जनशीलता , लवचिकता, धैर्य,कठोर परिश्रम घेण्याची वृत्ती,वचनबद्धता, आदी मूल्ये अध्ययन अध्यापन प्रक्रियेवेळी शिक्षकांनी प्रभावी पणे रुजवण्याची गरज असल्याचे सांगितले. रत्नागिरी येथे सुरू असलेले प्रशिक्षण हे डाएटचे प्राचार्य सुशीलकुमार शिवलकर, राहुल बर्वे, राजेंद्र लठ्ठे यांच्या मार्गदर्शनासाठी तर अश्विनी काणे ह्या साधनव्यक्ती म्हणून काम पाहत आहेत. तर प्रभात कोकजे, सागर पोकळे, एस आर जोपळे, मोहन बापट, दिगंबर गवळी, वर्षा घाग, विभा बाणे, सुधीर शिंदे,अनंत जाधव, विष्णू पवार आदी सुलभक म्हणून काम पाहत आहेत.