(मुंबई / रामदास गमरे)
“आनंदराज आंबेडकर हे केवळ रक्ताचे नव्हे, तर विचारांचेही वारसदार आहेत. त्यांनी आपल्या नेतृत्वगुणांद्वारे इंदू मिलसह बौद्धजन पंचायत समिती आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांवर प्रभावी नियंत्रण मिळवून समाजाला एक नवा आदर्श दिला आहे. त्यामुळे सध्याच्या बदलत्या सामाजिक व राजकीय परिस्थितीत समाजाला दिशा देण्याचे सामर्थ्य त्यांच्यातच आहे,” असे प्रांजळ मत माजी जिल्हाधिकारी मा. उत्तमराव खोब्रागडे यांनी व्यक्त केले.
ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर येथे आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन सेना महाराष्ट्र, बौद्धजन पंचायत समिती आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान यशवंत भैय्यासाहेब भालेराव यांनी भूषवले.
कार्यक्रमात धार्मिक पूजाविधी संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार आणि सरचिटणीस मनोहर बा. मोरे यांनी अत्यंत श्राव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडला. सूत्रसंचालनाची जबाबदारी लक्ष्मण भगत आणि विनोद काळे यांनी आपल्या प्रभावी भाषाशैलीत पार पाडली.
या दिवशी सम्यक कोकण कला संस्था (रजि.) महाराष्ट्र यांच्या वतीने गीतगायनाचा सुरेल कार्यक्रम सादर करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत विविध रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळवाटप आणि वृक्षारोपण उपक्रमही राबविण्यात आले.
तसेच, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अर्पिता गणेश चित्ते (९३.४०%) आणि सिमरन प्रकाश मोरे (९१%) यांना गौरवण्यात आले, तसेच सरपंच सुधीर परशुराम साळवी यांचा सत्कार आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते झाला.
कार्यक्रमात मनिषाताई आंबेडकर, ऍड. अमन दादा आंबेडकर, पांडुरंग साळवी, विनोद मोरे, तसेच अनेक मान्यवर, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजिव बौधनकर, ऍड. संघराज रुपवते, दिनेश डिंगळे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मनोगत व्यक्त करत आंबेडकर कुटुंबियांच्या सामाजिक योगदानाचे गौरवपूर्ण स्मरण केले.
कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या भावना व्यक्त करताना आनंदराज आंबेडकर भावूक झाले. त्यांनी उपस्थित सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि चाहत्यांचे मन:पूर्वक आभार मानले. आभार प्रदर्शन विनोद काळे यांनी केले.