( रत्नागिरी )
घरातून कुणालाही काही न सांगता निघून गेलेल्या तरुणाचा मृतदेह हातखंबा-तारवेवाडी येथील बंद चिरेखाणीतील पाण्यात तरंगताना आढळून आला. ही घटना १ जून रोजी सकाळी उघडकीस आली असून, मृत तरुणाची ओळख प्रसाद शंकर आंबेकर (वय २६) अशी झाली आहे. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
२९ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास प्रसाद आंबेकर हे घरातून कुठेही काहीही न सांगता बाहेर गेले होते. घरच्यांनी व नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. अखेर त्यांच्या बेपत्ताबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली होती आणि बेपत्ता व्यक्तीची नोंद करण्यात आली होती. रविवारी (१ जून) सकाळी सुमारे अकरा वाजता प्रसादचा भाऊ पाली येथे गेला असताना पोलिस पाटील सचिन रायट यांचा त्याला फोन आला. त्यांनी हातखंबा- तारवेवाडी येथील साईनगर परिसरातील बंद चिरेखाणीत पाण्यात एक पुरुष मृतावस्थेत तरंगताना दिसल्याची माहिती दिली. यानंतर प्रसादचा भाऊ घटनास्थळी धाव घेत खाणीत प्रेत पाहिले असता, त्याची ओळख प्रसाद आंबेकर याच्याप्रमाणे झाली.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. प्राथमिक तपासात मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसून, या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, तरुणाच्या मृत्यूमागचे नेमके कारण काय, याचा शोध लावण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.