(रत्नागिरी / प्रतिनिधी)
वाटद-खंडाळा येथे चार वर्षांपूर्वी वाहतुकीच्या चलनावरून झालेल्या वादातून झालेल्या तलवारीच्या हल्ल्याप्रकरणी आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आरोपीस एकूण ७ हजार रुपयांच्या दंडासह शिक्षा ठोठावली. योगेश अनंत सावंत (रा. सैतवडे, रत्नागिरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी संदेश सुरेश पवार (वय ३०, रा. वाटद-खंडाळा) यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ८ नोव्हेंबर २०२० रोजी ही घटना घडली. संदेश पवार हे ‘साहस ट्रान्सपोर्ट कंपनी’त सुपरवायझर म्हणून काम करत होते, तर आरोपी योगेश सावंत चालक होता. त्या दिवशी योगेशने मालवाहतुकीचे चलन कंपनीमध्ये जमा केले नव्हते. त्यामुळे संदेश यांनी त्यास फोन करून विचारणा केली असता त्यांच्यात बाचाबाची झाली. योगेशने काही वेळात येतो असे सांगून फोन ठेवला.
रात्री कंपनीबाहेर संदेश पवार, संकेत गुरव व अंबादास शिरसाट तिघे त्याची वाट पाहत थांबले होते. काही वेळाने योगेश दुचाकीवर आला आणि पुन्हा वाद झाला. त्यावेळी उपस्थितांनी वाद मिटवला आणि योगेश निघून गेला. मात्र काही वेळातच तो पुन्हा आला आणि त्याने शर्टाखाली लपवलेली तलवार बाहेर काढत थेट संदेश पवार यांच्यावर वार केला. कपाळावर गंभीर जखम झाली. पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न करताच अंबादास शिरसाट यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी हल्ला चुकवला आणि सर्वांनी घटनास्थळावरून पळ काढला.
जखमी झालेल्या संदेश यांनी उपचार घेतल्यानंतर जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार योगेशवर भादंवि कलम ३०७ (हत्या करण्याचा प्रयत्न) आणि शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक रायसिंग पाटील यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
सरकारी पक्षातर्फे अॅड. अनिरुद्ध फणसेकर यांनी १० साक्षीदार तपासात सादर करत प्रभावी युक्तिवाद केला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी सर्व पुरावे ग्राह्य धरून आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयाने भादंवि कलम ३०७ अंतर्गत १० वर्ष सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, तसेच हत्यार कायद्यानुसार ३ वर्ष शिक्षा आणि २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.