(संगमेश्वर)
पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांच्या आदेशानुसार संगमेश्वर पोलीस ठाणे स्तरावर सामाजिक सलोखा समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत सामाजिक कार्यकर्ते, राजकीय प्रतिनिधी, सर्व धर्मांचे धर्मगुरू तसेच प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश करून सामाजिक ऐक्य व शांततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
आज सकाळी 11.30 ते 12.40 या वेळेत पोलीस ठाणे येथे समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत समिती स्थापनेचा उद्देश स्पष्ट करत उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीत सांगण्यात आले की, समाजात सलोखा, शांतता आणि सौहार्द टिकवण्यासाठी सर्वधर्मीय मान्यवरांचा सहभाग अत्यावश्यक आहे. विशेषतः सण-उत्सवांच्या काळात गावात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी समितीच्या सदस्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशीय जनावरांची हत्या, गोमांसाची वाहतूक यासंदर्भात खबरदारी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. अशा प्रकारची कुठलीही माहिती मिळाल्यास त्वरित पोलीस ठाण्यात कळवण्याचे निर्देश देण्यात आले.
सामाजिक सलोखा समितीच्या माध्यमातून सर्व धर्मीय सण शांततेत व आनंदात साजरे होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे अधोरेखित करण्यात आले. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने गावपातळीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, अमली पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवणे, आणि कुठल्याही प्रकारची माहिती पोलीस ठाण्यात देणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले. या बैठकीस पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील विविध समाजांचे प्रतिष्ठीत 36 सदस्य उपस्थित होते.