(मुंबई)
यंदा मान्सून नेहमीपेक्षा लवकरच दाखल झाल्यामुळे राज्यभरात यंत्रणांची हालचाल सुरू झाली आहे. मात्र कोकण रेल्वेने पावसाळ्यातील संभाव्य आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपली तयारी अंतिम टप्प्यात आणली असून, प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. मार्चपासून युद्धपातळीवर सुरू असलेली तयारी आता पूर्णत्वास गेली आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली.
कोकण रेल्वे मार्ग हा केवळ वाहतुकीचा मार्ग नसून, निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला एक अद्वितीय प्रवास अनुभव आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रोहा येथून सुरू होणारा हा मार्ग गोवा, कर्नाटकातील ठोकूर स्टेशनपर्यंत विस्तारलेला आहे. दरवर्षी हजारो प्रवासी या मार्गावरून प्रवास करत असतात. परंतु, पावसाळ्यात दरड कोसळणे, पूरस्थिती आणि घाटांमधील धोके यांमुळे हा मार्ग अधिक धोकादायक ठरतो. म्हणूनच, यंदा कोकण रेल्वेने सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दृष्टीने अधिक कठोर नियोजन केले आहे.
महत्त्वपूर्ण उपाययोजना
कोकण रेल्वेच्या माहितीनुसार, १० जून ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मान्सून विशेष वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. या अंतर्गत:
- घाट व बोगदा परिसरात धावणाऱ्या गाड्यांसाठी ४० किमी प्रतितास वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
- ६५० हून अधिक कर्मचारी व अधिकारी मार्गावर २४ तास तैनात असतील.
- ९ ठिकाणी ‘रेल्वे मेंटेनन्स व्हेईकल्स’ सज्ज ठेवण्यात आले आहेत, जे दरड कोसळल्यास तत्काळ मदत करणार आहेत.
- अपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी विशेष व्हॅन, तसेच वेर्णा येथे अपघात निवारण पथक तैनात.
- १० ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रणा कार्यरत असून, तीन अति-संवेदनशील नदीपुलांवर पूर चेतावणी प्रणाली सक्रिय करण्यात आली आहे.
नैसर्गिक आपत्तींसाठी ठोस आपत्ती व्यवस्थापन
कोकण रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, दरवर्षीप्रमाणे यंदाही आपत्ती व्यवस्थापनाचा ठोस आराखडा तयार करण्यात आला असून, आपत्कालीन सेवा सज्ज आहेत. भूस्खलन प्रतिबंधक जाळ्यांची उभारणी, सीसीटीव्ही नियंत्रण, वेग मर्यादा निगराणी, आणि घाट भागांतील नियमित पाहणी यामुळे कोणतीही आपत्ती उद्भवल्यास तत्काळ प्रतिसाद देता येणार आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य
“प्रवाशांचा सुरक्षित व वेळेवर प्रवास हेच आमचं सर्वोच्च ध्येय आहे,” असं कोकण रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. कोणतीही तडजोड न करता, सुरक्षिततेला प्राधान्य देत कोकण रेल्वेने आपली संपूर्ण व्यवस्था कार्यान्वित केली आहे. पावसाळ्यात सौंदर्याचा अनुभव घेणाऱ्या प्रवाशांसाठी, यावर्षीचा प्रवास अधिक विश्वासार्ह आणि सुरक्षित होणार आहे.