(जाकादेवी / संतोष पवार)
अतिशय दुर्गम व ग्रामीण भागात, जिथे शिक्षणाच्या सोयी कमी होत्या, अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या मुलांप्रमाणे शिकवून जीवनाला योग्य दिशा देण्याचे कार्य आदर्शवत शिक्षकांनी अत्यंत त्यागी वृत्तीने केले. रत्नागिरी तालुक्यातील आत्माराम नारायण देसाई सोमेश्वर माध्यमिक विद्यालय विल्ये या प्रशालेतील उपक्रमशील शिक्षक व मुख्याध्यापक श्री. कमलाकर हेदवकर माजी मुख्याध्यापक श्री. भानुदास देशमुख, सेवानिवृत्ती शिक्षक श्री. वसंत पाटील यांचा सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभ शाळेच्या २००६ सालच्या इ.१० वी बॅचच्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून रविवार १ जून रोजी सकाळी १० वाजता विल्ये सोमेश्वर विद्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
शालेय गुणवत्तावाढीसाठी शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी सातत्याने झटत आले आहेत. इ.१० वी बोर्ड परीक्षेचे निकाल सर्वोत्तम लावण्यात शिक्षकांचे योगदान मोलाचे ठरले आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेने खूप मेहनत घेतली आहे. शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विल्ये सोमेश्वर प्रशालेच्या आजी-माजी सर्व विद्यार्थांना ह्या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावे, अशी विनंती माजी विद्यार्थ्यांनी केली आहे .माजी विद्यार्थ्यांना काही कारणास्तव समारंभात सामील होणे शक्य नसल्यास, आपल्या बॅच मधील किंवा गावातील आजी-माजी विद्यार्थ्यांपर्यंत हे निमंत्रण पोहोचवून माजी विद्यार्थ्यांना आवर्जून उपस्थित राहण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
माजी शिक्षक व आजी- माजी मुख्याध्यापक सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभ आपल्या गुरूजन व विद्यार्थ्यांच्या आयुष्यभरात स्मरणात राहतील, असा भव्यदिव्य कार्यक्रम करण्याचा संकल्प माजी विद्यार्थ्यांनी केला आहे.