(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कचरा साफ केल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा कचरा टाकल्याबाबत विचारणा केल्याने वाद उफाळून शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. २३ एप्रिल) सकाळी ७ वाजता क्रांतीनगर झोपडपट्टी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम वल्लाप्पा मुलीमनी (वय ४१) यांच्या पत्नीने परिसरात स्वच्छता करत असताना, शेजारी राहणाऱ्या महिलेने साफ केलेल्या ठिकाणी पुन्हा कचरा टाकला. यावरून दोघींमध्ये वाद झाला आणि त्या महिलेने शिवीगाळ केली. वादाचे स्वरूप वाढल्यावर परशुराम यांची मुलगी आणि मेव्हणा शांताप्पा बाहेर आले. त्यावेळी परसप्पा मुलीमनी, अळप्पा मुलीमनी, मरव्या अळप्पा मुलीमनी आणि एक अनोळखी महिला यांनी मिळून मारहाण केली. परसप्पा यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करत गंभीर दुखापतही केली.
या प्रकरणी परशुराम मुलीमनी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.