( गुहागर )
लोणावळ्यात चारचाकी वाहन वळवण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर तुफानी हाणामारीत होऊन, गुहागर तालुक्यातील अडूर-कोंडकारुळ गावातील कमलेश तानाजी धोपावकर (वय ४५) यांचा मारहाणीत मृत्यू झाला होता. या घटनेत त्यांचे इतर दोन सहकारी जखमी झाले होते.
ही धक्कादायक घटना रविवारी (२५ मे) रात्री उशिरा लोणावळ्यात घडली होती. पर्यटनासाठी गेलेल्या तिघांवर गाडीच्या वादातून अचानक हल्ला झाला आणि वादात कमलेश धोपावकर यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, लोणावळा पोलिसांनी या प्रकरणी नऊ संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
कमलेश धोपावकर हे त्यांच्या सहकाऱ्यांसह करंजा बंदरातील बोटीवर मच्छीमारीचे काम करत होते. समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाल्याने मच्छीमारी ३० मेपूर्वीच थांबवावी लागली. त्यानंतर बोटीच्या नाखवाने सर्व खलाशांना लोणावळ्यातील मच्छीमार समाजाचे कुलदैवत श्री एकवीरा आईच्या दर्शनासाठी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.
कमलेश आणि त्यांचे १६ सहकारी भाड्याच्या वाहनाने लोणावळ्याला गेले. तेथे एका फार्महाऊसमध्ये खोली भाड्याने घेऊन त्यांनी देवदर्शन केले. सायंकाळी फार्महाऊसवरून निघताना तेथेच थांबलेल्या चार ते पाच युवकांबरोबर वाहन वळवण्यावरून त्यांचा किरकोळ वाद झाला. फार्महाऊसच्या मालकाने तो वाद तत्काळ मिटवला.
मात्र, अवघ्या १५ मिनिटांत एक मोटार, एक रिक्षा व दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तरुणांनी कमलेश यांच्या वाहनाला आडवे अडवले. त्यांनी वाहनाची किल्ली काढून घेतली आणि काठ्या व लोखंडी रॉडने मारहाण सुरू केली.
या हल्ल्यात कमलेश यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली. त्यांच्या सहकाऱ्यांपैकी मनोज वरवाटकर यांचा हात फ्रॅक्चर झाला, तर प्रज्वल मेहताच्या डोक्याला मार लागला. हल्लेखोर त्वरित घटनास्थळावरून फरार झाले. स्थानिकांच्या मदतीने तिघांनाही ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी कमलेश धोपावकर यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी लोणावळा पोलिसांनी निकेश कांबिरे, प्रतीक देशमुख, यश पडवळ (सर्वजण रा. वेहेरगाव तामावळ, लोणावळा ग्रामीण) आणि गौस संजय पट्टाधारी (रा. तुंगारळी, लोणावळा) यांना अटक केली आहे. उर्वरित पाच आरोपींचा शोध सुरू असून, त्यातील दोन आरोपींना २६ मे रोजी एका लग्नाच्या मांडवातून अटक करण्यात आली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण अडूर-कोंडकारुळ गावात संतापाचे वातावरण असून, कमलेश धोपावकर यांना न्याय मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.