(रत्नागिरी)
तालुक्यातील कर्ला-लिमयेवाडी येथील पोलीस पाटील उदय मधुसूदन लिमये (वय ५८) यांनी आज बुधवारी (२८ मे) दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना दुपारी ११.४५ वाजता त्यांच्या राहत्या घरी घडली. उपचारासाठी तत्काळ त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सकाळी त्यांनी पूजेसाठी फुले काढून पूजा केली होती. तसेच पोळी-भाजीही खाल्ली. त्यानंतर पत्नी व मुलगी नोकरीनिमित्त घराबाहेर गेले. घरात कोणी नसताना त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. नोकरीस गेलेल्या पत्नीने दुपारचे जेवण करण्यासाठी त्यांना फोन केला असता त्यांनी कॉल उचलला नाही म्हणून त्या बघण्यासाठी घरी आल्या. तेव्हा दरवाजा उघडा होता. उदय लिमये हे हळव्या मनाचे होते. त्यांच्यावर कामाचे दडपण होते का? की आणखी कोणते कारण होते, याबाबत चर्चा परिसरात आहे. त्यांचेवर कोणतेही कर्ज नव्हते. सुखी समाधानी हे कुटुंब आहे, असे असताना त्यांनी आत्महत्या का केली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यांच्या एका मुलीचे लग्न झाले असून मुलगी व जावई आपल्या घरी आनंदात आहेत. तर दुसऱ्या मुलीचे ही लग्न ठरले आहे, अशी माहिती आहे.
उदय लिमये हे कर्ला-लिमयेवाडी प्रभागात पोलीस पाटील म्हणून कार्यरत होते. तसेच ते एक प्रसिद्ध वादक म्हणूनही पंचक्रोशीत ओळखले जात होते. बुधवारी सकाळी त्यांच्या पत्नी अंगणवाडीत कामासाठी गेल्या असताना घरात कोणीही नव्हते. याच वेळी लिमये यांनी घराच्या छताला लावलेल्या हुकास दोरी बांधून आत्महत्या केली.
दुपारी पत्नी घरी परतल्यानंतर त्यांनी हा प्रकार पाहिला व तातडीने कुटुंबीयांना कळवले. त्यांच्या भावाने लगेच त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
‘उत्कृष्ट पोलीस पाटील’ हा मान मिळवणाऱ्या आणि सदैव निष्पक्ष, प्रामाणिक व शांत स्वभावाच्या म्हणून ओळखले जाणाऱ्या लिमये यांच्या या टोकाच्या निर्णयामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूभोवती अनेक चर्चांना आणि शंकांना उधाण आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका आर्थिक व्यवहाराशी लिमये यांचा थेट काहीही संबंध नसतानाही, त्यांच्या नावावर संशयाची सुई वळल्याने त्यांच्यावर मानसिक दबाव आला का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
रत्नागिरीने गमावले एक कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व
उदय लिमये हे नाव रत्नागिरी तालुक्यातील प्रशासन आणि सामान्य नागरिकांमध्ये विश्वासार्हतेचं प्रतीक होते. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल कधीही कोणतं वावगं मत नव्हते. गावाच्या हितासाठी झटणारा, कोणत्याही राजकीय किंवा व्यक्तिगत दबावाला न जुमानणारा हा पोलीस पाटील आज काळाच्या पडद्याआड गेल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
शेवटी प्रश्न कायम – आत्महत्या का केली?
उदय लिमये यांच्यासारख्या सज्जन, प्रामाणिक आणि लोकाभिमुख पोलीस पाटलाने आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल का उचलावं लागलं? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. ही आत्महत्या आहे की कोणीतरी मानसिकदृष्ट्या त्रस्त करून त्यांना हे पाऊल उचलायला भाग पाडलं? याचा सखोल तपास होणे गरजेचे ठरत आहे.
उदय लिमये यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात निधनामुळे कर्ला-लिमयेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.