(बीड)
26 मे रोजी राज्यभरात पावसाने थैमान घातले असताना, बीड जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. गढी परिसरात सोमवारी रात्री उशीरा झालेल्या भीषण अपघातात गेवराई येथील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर चौकाजवळ घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गेवराई येथील काही नागरिकांचे चारचाकी वाहन तांत्रिक बिघाडामुळे गढी परिसरात बंद पडले होते. त्यामुळे ते सहाजण वाहन घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या वाहनाला जबर धडक दिली. धडकेत गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि सर्व सहाजणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले असून कंटेनर चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
अशी आहेत मृतकांची नावे
बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाला असून एका जण गंभीर जखमी झाला आहे. या जखमी व्यक्तीवर सध्या उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थाळ गाठत पुढील कारवाई सुरू केली आहे. या घटनेत कारचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळावरुन फरार झाला आहे. त्यामुळे पोलीस या ट्रक चालकाचाही शोध घेत आहेत.