(रत्नागिरी)
दिशा सालियन प्रकरणात तिच्या वडिलांनी कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, खास. नारायण राणे यांनी दिशा सालियन प्रकरणात पूर्वीपासूनच आदित्य ठाकरे यांचं नाव जोडलं आहे. मात्र २०२१ साली घडलेल्या या घटनेची फाईल आता पुन्हा उघडली गेल्याने नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी उद्धव ठाकरेंनी फोन करून त्यांना कशी विनंती केली होती, यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे यांच्या नावाचा समावेश आहे. याच प्रकरणावरून माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलतांना खळबळजनक दावा केला आहे.
यावेळी ते म्हणाले की, “ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मी वांद्रे ओलांडून मुंबईतील माझ्या जुहूतील घरी जात असताना मला उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकरांचा फोन आला. त्यावेळी ‘दादा, साहेबांना बोलायचंय, असं नार्वेकर म्हणाले. मी म्हटलं कोण साहेब? त्यावर नार्वेकर म्हणाले उद्धवजी. ते गाडी चालवत असून त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे त्यांच्या फोनवरुन माझ्याशी बोलले”, असे राणेंनी म्हटले.
पुढे बोलतांना राणे म्हणाले की, “त्यानंतर मला दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे यांच नाव घेऊ नका अशी विनंती करणारा उद्धव ठाकरेंचा दुसरा फोन करोनाच्या काळात आला होता. त्यावेळी आपल्या हॉस्पिटलची परवानगी राज्य सरकारकडे मागितली होती. हॉस्पिटल संबंधित ती परवानगी मिळेल असे त्यांनी सांगितले. तुम्ही जरा या प्रकरणात सहकार्य करा”, असेही ते आपल्याला म्हणाल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले. तसेच “तुम्ही पत्रकार परिषदेत आदित्यचे नाव घेता. माझी विनंती आहे की, आपण त्याच्या नावाचा उल्लेख करू नये. त्यानंतर मी त्यांना म्हटले की, ‘मी अमुक ठिकाणी कोण आहे, याचा उल्लेख केलेला नाही. निपराध मुलीची अत्याचार करून हत्या झाली. मी आरोपींना अटक करण्याविषयी बोलत आहे. तुमचा मुलगा संध्याकाळी कुठे जातो, त्यापासून सांभाळा. त्याला सांगा की, डिनो मोरियाच्या घरी जाऊन काय धुमाकूळ घालतो, हे मला माहीत नाही. मला माहीत आहे, पण तुम्हाला येथे सांगणार नाही. त्यानंतर त्यांनी मी पाहतो”, असे म्हटल्याचे नारायण राणे म्हणाले.