(पुणे)
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाने संपूर्ण समाज मन हेलावून टाकले. याच पार्श्वभूमीवर पुण्यात मराठा समाजाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सुनांवरील छळ, हुंडा प्रथा आणि लग्नातील फाजील खर्च रोखण्यासाठी ठोस निर्णय घेण्यात आले.
समाजहितासाठी एकत्र आले मराठा बांधव
पुणे शहर व जिल्ह्यातील मराठा समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी या बैठकीस उपस्थित राहून एकात्मतेचा संदेश दिला. बैठकीनंतर श्रीकांत शिरोळे यांनी सांगितले की, “वैष्णवीसारख्या मुलींना पुढे अशा छळाचा सामना करावा लागू नये म्हणून समाज पातळीवर पावले उचलली जात आहेत.” विशेष समिती स्थापन करून लग्नातील अनिष्ट प्रथांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
अरविंद शिंदे यांनी सांगितले की, अनेक कुटुंबांनी आपल्या घरापासूनच या परिवर्तनाची सुरुवात करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या निर्णयांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
- लग्न सोहळे अत्यंत साधेपणाने पार पाडणे
- हुंडा, गाडी, सोने, अंगठी यांसारख्या देणग्यांना स्पष्ट नकार
- मुलीवर छळ करणाऱ्या कुटुंबांशी ‘रोटी-बेटी’ संबंध तोडणे
- अशा घटनांवर समाजाच्या वतीने थेट जाब विचारणे
- सामाजिक बहिष्काराचा इशारा व
चेतन तुपे यांनी स्पष्ट इशारा दिला की, “हुंड्यासाठी छळ करणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात येईल.” अशा कुटुंबांना सामाजिक सन्मान व वावरण्याचा अधिकार नाकारण्यात येईल, अशी ठाम भूमिका समाजाने घेतली आहे.
नवीन मार्गदर्शक तत्त्वे आणि उपाययोजना
मराठा समाजाने पुढील सामाजिक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे:
- लग्न सोहळे साधेपणाने करणे
- मोठ्या मंडळींच्या दिखाव्याचा अंधानुकरण टाळणे
- योग्य वयात विवाह संपन्न करणे
- सुनांवरील छळ झाल्यास संबंधित कुटुंबावर सामाजिक बहिष्कार
- गाडी, दागिने, रोख रक्कम यांसारख्या देणग्यांना स्पष्ट नकार
- अशा मागण्या करणाऱ्यांना सामूहिक पातळीवर समज देणे
सामाजिक शुद्धीकरणाची सुरुवात
ही बैठक केवळ प्रतिक्रिया नसून समाजातील सामूहिक जागृती आणि शुद्धीकरणाची सुरुवात असल्याचे सर्वच वक्त्यांनी नमूद केले. विवाहसंस्थेतील अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी समाजाने एकत्र येऊन निर्णायक भूमिका घेतली आहे. याचे पालन समाजातील प्रत्येकाने करणे ही आता केवळ जबाबदारी नसून एक सामाजिक कर्तव्य आहे.