(दापोली)
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर दापोली तालुक्यातील वणंद येथे आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. नदीला आलेल्या पुरामुळे कोंडीच्या पुलावरून एक तरुण वाहून गेला. राजेंद्र कोळंबे (वय ४५) असे या व्यक्तीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, राजेंद्र कोळंबे सकाळी ड्युटीवरून घरी परतत होते. मात्र, नदीला आलेल्या पुराचा अंदाज न आल्यामुळे ते कोंडी पुल पार करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.
घटनेची माहिती मिळताच दापोली पोलीस, महसूल विभाग आणि स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या नदीपात्रात कोळंबे यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत असले तरी प्रशासनाने शोध थांबवलेला नाही.
प्रशासनाने नागरिकांना नदी व नाल्यांपासून दूर राहण्याचे आणि अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.