(संगमेश्वर / प्रतिनिधी)
कोकणात अवकाळी पावसाला सुरुवात होताच रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा उघड झाली आहे. संगमेश्वर ते शास्त्री पूल दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः माभळे येथील खड्डा हा अपघातांचे मुख्य कारण ठरत आहे.
वाहनांच्या वेगावर मर्यादा येत असून, संतुलन बिघडल्याने किरकोळ अपघातांची मालिका सुरू झाली आहे. रोजच्या प्रवासात चाकरमानी वर्गाला या खड्ड्यांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व प्रशासन यांच्याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. “प्रशासनाचे दुर्लक्ष आणि देखरेखीअभावीच ही अवस्था झाली आहे,” अशी तीव्र टीकाही नागरिकांकडून होत आहे.
या रस्त्यांची झालेली पडझड ही पावसाची नाही, तर यंत्रणेच्या हलगर्जीपणाचीच साक्ष असल्याचे प्रवासी व्यक्त करत आहेत. वेळेत खड्डे न बुजविल्यास मोठ्या अपघातांचे संकट उभे राहू शकते, याची जाणीव प्रशासनाने घ्यावी, अशी जनतेची आग्रही मागणी आहे.