(चिपळूण)
तालुक्यातील कुटरे बौद्धवाडी येथील जांभी नदीत बुडून साहिल संदीप कदम (वय २६) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. २० मे रोजी सायंकाळी ६.४५ वाजता ही हृदयद्रावक घटना घडली असून, साहिलचा मृतदेह २१ मे रोजी सकाळी पाण्यावर तरंगताना आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, साहिल कदम हा २० मे रोजी सायंकाळपासून बेपत्ता होता. नातेवाईक व मित्रांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास जांभी नदीतील पिंपळाच्या डोहाजवळ साहिलचा मृतदेह आढळून आला.
स्थानिकांच्या मदतीने त्याला तात्काळ पाण्याबाहेर काढण्यात आले आणि कामथे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. प्राथमिक तपासणीत बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या दुर्घटनेमुळे कुटरे बौद्धवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. चिपळूण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्र. १७/२०२५ बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

