(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरालगतच्या कारवांचीवाडी आदिशक्तीनगर येथे १७.९० गुंठे जमिनीसंदर्भात बनावट खरेदीखत तयार करून ती विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सहा संशयितांविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीच्या या कारवायीत खोटी स्वाक्षरी, बनावट अंगठा आणि दुसऱ्याच व्यक्तीचा फोटो वापरून दुय्यम निबंधक कार्यालयाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
चंद्रकांत वासू कांबळे (वय ६२, रा. कारवांचीवाडी, पोमेंडी बुद्रुक, रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संगीता चंद्रकांत घाणेकर, सुवर्णा रघुनाथ कळंबटे, सुप्रिया संजय कोत्रे, संतोष वासुदेव कांबळे, सुरेश वासुदेव कांबळे आणि अशोक विठ्ठल घवाळी या सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तक्रारदार व आरोपी यांच्यात कारवांचीवाडीतील सदर जमीन सामायिक स्वरूपात होती. २०२३ मध्ये संतोष व सुरेश कांबळे यांनी तक्रारदाराला जमीन विक्रीबाबत प्रस्ताव दिला होता. मात्र, कोणतीही अधिकृत बोलणी न करता फेब्रुवारी २०२५ मध्ये चंद्रकांत कांबळे सातबारा उतारा घेण्यासाठी पोमेंडी बुद्रुक कार्यालयात गेले असता, आपली जमीन विकली गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
तहसील कार्यालयातून घेतलेल्या खरेदीखताच्या छायांकित प्रतीवरून ही फसवणूक स्पष्ट झाली. त्या दस्तऐवजांमध्ये तक्रारदारांचे नाव लिहून दुसऱ्याच व्यक्तीचा फोटो लावण्यात आला होता. शिवाय बनावट सही आणि अंगठाही लावण्यात आला होता. तसेच सामायिक प्रतिज्ञापत्र तयार करून त्यावर तक्रारदार असल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता.
या प्रकारामुळे तक्रारदाराची फसवणूक झाली असून, या घटनेनंतर त्यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सहा जणांविरुद्ध संबंधित कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.