(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर शहरात गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे रस्ते जलमय झाले असून, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्ण आणि नियोजनशून्य काम ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण ठरत आहे. पावसाचे पाणी मार्गस्थ होण्यासाठी आवश्यक ते नाले वा जलवाहिनीचे नियोजन न केल्याने रस्त्यालगतच्या दुकानदारांना आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
एसटी स्टँड परिसरात पाणी घुसले, दुकाने जलमय
सोमवारी रात्री अचानक पडलेल्या जोरदार पावसामुळे डोंगर उतारावरून वाहत आलेले पाणी थेट एसटी स्टँडमध्ये शिरले. यामुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. पावसाचे पाणी रसवंतीगृह, साहिल कोल्ड्रिंक्स, साहिल मोबाईल, तसेच नवनाथ शेट्ये यांच्या दुकानात घुसले आणि तिथून नाल्यासारखे वाहत गेले. यामुळे एसटी स्टँड व देवरुख मार्ग पूर्णतः पाण्याखाली गेले. रस्त्याने वाहणाऱ्या पाण्यामुळे परिसरात पुरसदृश स्थिती निर्माण झाली होती.
दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस; दुकाने पुन्हा जलमय
आज (मंगळवार) दुपारी पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावली आणि सोमवारचीच स्थिती पुन्हा अनुभवायला मिळाली. डोंगरावरून वाहत येणारे चिखलामिश्रित पाणी महामार्गावरून सरळ बाजारपेठेत शिरले. भाजी मार्केट आणि कोंबडी गल्ली परिसरात पाण्याचा जोरदार प्रवाह निर्माण झाला होता. व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले, तर सामान्य जनतेचेही जनजीवन विस्कळीत झाले.
ठेकेदाराच्या उशिरा सुचलेल्या शहाणपणावर संताप
दोन दिवसांनंतर ठेकेदार कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने पाणी वाहण्यासाठी मार्ग तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, ही उपाययोजना वेळेत का केली नाही, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. ठेकेदार कंपनीने महामार्गाचे काम घेतले आहे की लोकांच्या संकटाचे कारण व्हायचे ठरवले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया जनतेकडून व्यक्त होत आहे.
संगमेश्वरमध्ये महामार्ग विकासाचे नियोजन न झाल्याने अवकाळी पावसात जनतेला मोठा फटका बसला आहे. प्रशासनाने आणि संबंधित ठेकेदार कंपनीने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेणे आणि कायमस्वरूपी जलनिस्सारण यंत्रणा उभारणे अत्यावश्यक आहे.