(दापोली)
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या अमानुष हल्ल्यात पर्यटनासाठी गेलेल्या अनेक निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली. लोकभावनेचा सन्मान राखत भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात घुसून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले आणि दहशतवाद्यांच्या तळांवर जोरदार हल्ला करत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले.
भारतीय लष्कराच्या या शौर्यपूर्ण कारवाईचा गौरव करण्यासाठी दापोली येथे भव्य ‘तिरंगा रॅली’ चे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली शिवस्मारक, बाजारपेठ येथून सुरू होऊन तहसील कार्यालय येथे सांगता झाली. या रॅलीत मान्यवरांसह सैनिकांच्या माता, पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्ष साक्षीदार नागरिक, माजी सैनिक, एनसीसीचे विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने दापोलीकर नागरिक सहभागी झाले होते.
रॅली दरम्यान “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “जय जवान जय किसान”, “भारतीय जवानांचा विजय असो” अशा देशभक्तिपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
रॅली तहसील कार्यालय येथे पोहोचल्यानंतर माजी सैनिक आणि सैनिकांच्या मातांनी आपल्या भावना आणि विचार मांडले. त्यांच्या भाषणांनी उपस्थितांची मने भारावून गेली. रॅलीची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.