(नवी दिल्ली)
लष्कर-ए-तोयबाचा कुख्यात टॉप कमांडर सैफुल्ला खालिद पाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांच्या गोळीबारात ठार झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. रविवारी (दि. १८ मे) रोजी झालेल्या या घटनेने दहशतवादी संघटनांमध्ये खळबळ उडाली आहे. खालिद भारतातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय सहभागी होता आणि गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानात लपून नेटवर्क मजबूत करत होता. त्याच्या हालचालींवर भारतीय गुप्तचर यंत्रणाही सतत लक्ष ठेवून होत्या.
भारतावर झालेल्या हल्ल्यांचा सूत्रधार
सैफुल्ला खालिद याचे नाव 2006 च्या नागपूर दहशतवादी हल्ल्यात तसेच उत्तर प्रदेशातील रामपूर सीआरपीएफ कॅम्पवरील हल्ल्यात समोर आले होते. त्याने बेंगळुरूमध्येही कट रचल्याचे पुरावे सुरक्षा यंत्रणांकडे होते. या सर्व हल्ल्यांमध्ये त्याची भूमिका दहशतवाद्यांना आर्थिक आणि तांत्रिक मदत पुरवण्याची होती.
भारतामधील हल्ल्यांनंतर खालिद नेपाळमध्ये पळून गेला होता. तिथे बनावट नावांनी आणि कागदपत्रांच्या आधारे राहून त्याने मोठा दहशतवादी तळ उभारला होता. या तळावरून त्याने भारतात हल्ल्यांची आखणी आणि अंमलबजावणी केली. याबाबतची माहिती भारतीय गुप्तचर संस्थांना मिळताच, त्याला अटक करण्यासाठी योजना आखली जात होती. मात्र त्याआधीच खालिद पुन्हा पाकिस्तानात परतला.
हत्या की नियोजित कारवाई?
खालिदच्या मृत्यूसंदर्भात अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र “अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबारात ठार मारण्यात आल्याचे” सांगण्यात येत आहे. ही हत्या स्थानिक गुन्हेगारी कारवाई आहे की गुप्तचर पातळीवरील ऑपरेशन, यावर अधिकृत खुलासा अपेक्षित आहे.
सैफुल्ला खालिद याच्या मृत्यूनंतर लष्कर-ए-तोयबाच्या नेटवर्कवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारताविरोधातील कट कारस्थानांमध्ये गुंतलेल्या अशा दहशतवाद्यांच्या हालचालींवर भारत सरकार आणि सुरक्षा यंत्रणा सातत्याने लक्ष ठेवून आहेत. खालिदसारख्या टॉप कमांडरच्या मृत्यूनंतर दहशतवादी संघटनांच्या पुढील हालचालींवरही बारीक नजर ठेवली जात आहे.