(मुंबई)
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या ३ डोंबिवलीकरांसह सर्व पीडितांना आपल्या भारतीय सशस्त्र दलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला. या ऑपरेशनदरम्यान भारतमातेच्या वीरपुत्रांनी दाखविलेल्या शौर्य, संयम आणि बलिदानाच्या सन्मानार्थ डोंबिवलीत ‘भव्य तिरंगा यात्रा’ भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
श्री गणपती मंदिर संस्थान येथून गणरायाच्या आशीर्वादाने सुरू झालेली तिरंगा यात्रा इंदिरा चौक – पीपी चेंबर्स – सर्वेश हॉल – पारसमणी नाका करत छत्रपती शिवाजी महाराज चौक (घरडा सर्कल) येथे पोहोचली. डोंबिवलीचे वीरपुत्र कॅप्टन विनयकुमार सच्चान स्मारक येथे त्यांच्या पुण्यस्मृतींस अभिवादन करून यात्रेचा समारोप झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील नवा भारत प्रसंगी दहशतवादाविरुद्ध किती कठोर, कणखर होऊ शकतो; हे ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे जगाने पाहिले. यानिमित्ताने दिसलेल्या नव्या भारताच्या लष्करी सामर्थ्यासोबतच कोट्यवधी भारतीयांची एकजूट हे ‘ऑपरेशन सिंदूर’चे यश आहे, अशी ग्वाही यात्रा समारोपाप्रसंगी दिली.
या यात्रेदरम्यान आ. सुलभाताई गायकवाड, आ. राजेश मोरे, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, गुलाबराव कारंजुले, नरेंद्र पवार, नाना सूर्यवंशी, नंदू परब, नंदू जोशी यांच्यासह पवन पाटील, प्रियाताई जोशी, करण जाधव, धनाजी पाटील, मंदार टावरे, समीर भंडारे, रितेश फडके, सचिन काटे, अमित धात्रस, विजय उपाध्याय, नितेश म्हात्रे, संतोष शेलार, मितेश पेणकर आदी मंडल अध्यक्ष उपस्थित होते. तसेच डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमीमधील प्रशिक्षणार्थी आणि मोठ्या संख्येने कल्याण-डोंबिवलीकर या यात्रेत सहभागी झाले होते.