(रायगड)
प्रेमसंबंधातील वादातून घडलेल्या दुहेरी मृत्यूच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला आहे. बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडची निर्घृण हत्या करून त्यानंतर स्वतः आत्महत्या केल्याची घटना सुधागड तालुक्यातील परळी येथे मंगळवारी (१३ मे) घडली.
पौर्णिमा अनंत देसाई (वय २६), ही देसाईपाडा, सुधागड येथील रहिवासी असून ती परळी येथील राजेंद्र पॉलीक्लिनिक नर्सिंग होम मध्ये नर्स म्हणून कार्यरत होती. तिचे शेखर संतोष दुधाणे (वय २८, रा. दुधानेवाडी) या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. काही काळ सर्व काही सुरळीत असताना, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात सतत वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे.
मंगळवारी सकाळी पौर्णिमा नेहमीप्रमाणे कामावर गेली होती. काही वेळातच शेखर दवाखान्यात पोहोचला आणि त्याने अचानकपणे धारदार कोयत्याने तिच्यावर सपासप वार केले. गंभीर जखमांमुळे पौर्णिमाचा जागीच मृत्यू झाला. तिचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. या अमानुष हत्येनंतर, घटनास्थळीच शेखरनेही दवाखान्यातील दुसऱ्या एका खोलीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे या प्रेमसंबंधाचा अत्यंत दुर्दैवी शेवट झाला.
घटनेची माहिती मिळताच पाली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक चौकशीतून या दोघांमध्ये सतत वाद होत असल्याचे समोर आले असले तरी, नेमकी हत्या कोणत्या कारणामुळे झाली याचा तपास सुरू आहे. किरकोळ वाद इतक्या टोकाच्या हिंसक शेवटापर्यंत कसे गेले, हा प्रश्न आता समाजासमोर आहे.
या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. सर्व स्तरांतून या दुर्घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रेमातील मतभेद इतके टोकाचे वळण घेऊ शकतात, याचे हे अत्यंत भयावह आणि विचारप्रवृत्त करणारे उदाहरण आहे.