(लांजा)
तालुक्यातील गोविळ बौद्धवाडी येथे वीज कोसळून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा एकजण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (१४ मे) सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश चिमाजी जाधव (वय ४५) आणि समीर चंद्रकांत पवार (वय ३५) हे दोघेही गोविळ बौद्धवाडी येथील रहिवासी आहेत. बुधवारी सकाळी ते मुंबईहून मोटारसायकलने गावाकडे परतत होते. सायंकाळी लांजामध्ये दाखल झाल्यानंतर गावाकडे जात असताना अचानक विजांचा कडकडाट आणि पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे ते दोघेही गोविळ बौद्धवाडी परिसरात एका झाडाखाली आडोशाला थांबले.
याच वेळी अचानक विजेचा प्रचंड कडकडाट झाला आणि वीज थेट त्यांच्या अंगावर कोसळली. या दुर्घटनेत राजेश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर समीर पवार यांच्या पायाला गंभीर इजा झाली. अपघातानंतर समीर पवार यांनी गावात जाऊन घटनेची माहिती दिली. तत्काळ ग्रामस्थांच्या मदतीने दोघांनाही लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी राजेश जाधव यांना मृत घोषित केले, तर समीर पवार यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे गोविळ गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पंचनामा करण्यात आला.