(मुंबई)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक खळबळजनक दावा करत शासकीय विश्रामगृहात महिलेवर सहा दिवस सामूहिक अत्याचार झाल्याचा आरोप केला आहे. ६ तारखेला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींपैकी काहीजण हे ६५ वर्षांवरील असल्याचे सांगण्यात येते. या आरोपींमध्ये एका प्राचार्याचाही समावेश असल्याचे आव्हाड यांनी आपल्या ट्विटमधून म्हटले आहे.
दाव्यामुळे खळबळ
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “या गुन्ह्याच्या तपासात शासकीय विश्रामगृहातील सीसीटीव्ही फुटेज अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. प्रत्येक विश्रामगृहात शासनाच्या आदेशाने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत आहे. मात्र, हे फुटेज न तपासताच, केवळ राजकीय हेतूने आणि वैमनस्यातून लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.”
पोलिसांवर दबावाचा आरोप
आव्हाड पुढे म्हणाले, “माझ्या माहितीनुसार, पोलिसांनी सुरुवातीला हा गुन्हा नोंदवण्यास नकार दिला होता. मात्र, वरून दबाव आल्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणात अनेक बाबी संशयास्पद आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, गोरगरीब लोकांचे चारित्र्यहनन करून त्यांचे जीवन उद्ध्वस्त करू नये. उद्या या गोष्टीमुळे एखाद्याने आत्महत्या केली, तर त्याला जबाबदार कोण धरणार?” असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.